पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क पैसे देऊ नये कृषी विभागाचे आवाहन



पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क पैसे देऊ नये

कृषी विभागाचे आवाहन

         वाशिम, दि. 01 (जिमाका) : या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिक नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम संबंधित विमा कंपनी आणि कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारल्या जात नाही, नुकसानीचे सर्व्हेक्षण हे वस्तुनिष्ठ करण्यात येत आहे. त्यामुळे पिक नुकसान नसतांना चुकीने पिक नुकसान झाल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला पैशाचे अमिष दाखवू नये. तसेच कंपनीचे प्रतिनिधी सुध्दा सर्व्हेक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही. त्यामुळे अफवांना बळी पडू नये. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

         सन 2022-23 या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्हयातील 2 लक्ष 76 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना काढला आहे. 83 हजार 750 शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गीक आपत्तीअंतर्गत पिक नुकसानीबाबत पुर्व सूचना दिल्या आहे. प्राप्त पिक नुकसानीच्या तक्रारीच्या अनुषंगाने 50 हजार 575 शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. जिल्हयात सर्व तालुक्यातून शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त अर्जाची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही ठिकाणी काही शेतकरी माझे पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण आधी करा असा आग्रह पिक विमा कंपनीच्या सर्व्हेअरकडे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त पिक नुकसान सूचना पत्राचे सर्व्हेक्षण विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागामार्फत नि:शुल्क करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना व भुलथापांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीस सर्व्हेक्षण शुल्क अथवा कोणत्याही कारणास्तव पैसे देऊ नये. याबाबत कुणीही पैशाची मागणी केल्यास संबंधित गावचे कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संबंधिताची तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे