महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रा 15 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा



महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रा

15 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा

       वाशिम, दि. 30 (जिमाका) : नागरीकांच्या नव संकल्पनांना मुर्तस्वरुप देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. ही यात्रा जिल्हयातील विविध तालुकास्तरावर चित्ररथासह प्रचार, प्रसिध्दीसाठी २५ ऑगष्ट ते ३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल झालेली होती. यादरम्यान या जिल्हयातील नवउद्योजक किंवा युवक-युवतींनी जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत सहभागी होण्याकरीता www.msins.in किंवा  www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर त्यांच्या नावांची नोंदणी केलेली आहे. या नोंदणीकृत उमेदवारांना वाशिम येथील राजस्थान आर्य कॉलेज येथे आयोजित सादरीकरण स्पर्धेत सहभागी होवून नव उदयोगासंबंधीची संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे.

         जिल्हयातील ज्या उमेदवारांना १४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होवून संकल्पना सादर करायची आहे, त्यांनी वरील संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन पध्दतीने पूर्व नाव नोंदणी करावी. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नवउदयोजक तसेच उमेदवारांकरीता वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. जिल्हयातील कोणताही व्यक्ती या सादरीकरण स्पर्धेत सहभागी होवू शकतो. पुढील ७ विविध क्षेत्रात त्यांची संकल्पना सादर करता येईल. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इत्यादी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता व इतर क्षेत्राचा समावेश आहे.

         सादरीकरण केलेल्या संकल्पनांपैकी सर्वोत्कृष्ट संकल्पनांची निवड जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या ज्युरी समितीमधील तज्ञ सदस्यांकडून करण्यात येईल. यामध्ये जिल्हास्तरावर सर्वोत्तम संकल्पना सादरीकरण करणाऱ्या नवउद्योजकास प्रथम क्रमांक २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक १० हजार रुपये असे पारितोषिक घोषित करण्यात येईल. घोषित बक्षिसांची रक्कम राज्यस्तरावरील सादरीकरण स्पर्धेच्या ठिकाणी वितरीत करण्यात येणार आहे.

           राज्यस्तरावरील सादरीकरण स्पर्धेमधील सर्वोत्तम सादरीकरणापैकी एकूण सर्वोत्कृष्ट १४ संकल्पनांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे रोख स्वरूपातील पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/ निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील संस्थांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर क्रेडिटस, क्लाऊड क्रेडिट्स, व इतर तत्सम लाभ/ सहाय्य आदींचे पाठबळ पुरविण्यात येणार आहे.

           तरी जिल्हयातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी तसेच युवक-युवतींनी जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत सहभागी होवून संकल्पना सादर करण्यासाठी नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाचे दिपक भोळसे (९७६४७९४०३७) व अतिष घुगे (९८५०९८३३३५) यांच्याशी संपर्क साधावा.

                                                                                                                                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे