1 ते 30 सप्टेंबरपर्यंतराष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन



1 ते 30 सप्टेंबरपर्यंत

राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन

         वाशिम, दि. 01 (जिमाका) : महिला आणि बालकांचे पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करतांना महिला व आरोग्य, बालक व शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण देखील, लिंग संवेदनशिलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन आणि आदिवासी भागातील महिला व मुलांकरीता पारंपारीक खाद्य पदार्थ या चार प्रमुख संकल्पना केंद्र शासनाने सुचविल्या आहे.

           1 सप्टेंबर- पोषण महिना उदघाटन समारंभ, या दिवशी पोषण महिना उदघाटन समारंभाचे जिल्हा, तालुका व अंगणवाडीस्तरावर आयोजन करणे. 2 सप्टेंबर- गाव व तालुकास्तरावर पोषण रॅलीचे आयोजन करणे, यामध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशावर्कर, ग्राम स्वच्छता, पाणी पुरवठा व आरोग्य समिती, ग्रामपंचायत यांचा सहभाग घेणे. 3 सप्टेंबर- गणेशोत्सव देखाव्यामध्ये सार्वजनिकस्तरावर पोषण अभियानाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये बॅनर लावणे. 4 सप्टेंबर- अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती व सार्वजनिक जागांवर औषधीयुक्त वनस्पतींचे वृक्षरोपण करुन पोषण वाटीका तयार करणे. 5 सप्टेंबर- 5 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सॅम व मॅम बालकांचा गाव व तालुकास्तरावर शोध घेऊन तपासणी करणे. 6 सप्टेंबर- अंगणवाडी केंद्र व घरोघरी योग शिबीराचे आयोजन करण्यास जनजागृती करणे तसेच गरोदरमाता व किशोरवयीन मुलींकरीता अंगणवाडीमध्ये योग शिबीराचे आयोजन करणे. 7 सप्टेंबर- ॲनिमियामुक्त भारताच्या अनुषंगाने गावपातळीवर गरोदर स्त्रियांची तपासणी, उपचार व समुपदेशन करणे. 8 सप्टेंबर- पुरक पोषण आहारासंदर्भात माहितीपट व व्हिडीओच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या मदतीने जनजागृती करणे. 9 सप्टेंबर- गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व सहा वर्षाखालील बालकांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी ॲनिमिया तपासणी शिबीराचे आयोजन करणे व त्यांच्यावर उपचार करणे. तसेच आयएफए गोळयांचे व जंतनाशक गोळयांचे वाटप करणे. 10 सप्टेंबर- प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायीक आरोग्य केंद्रस्तरावर गरोदर व स्तनदा मातांकरीता आहाराबाबत समुपदेशन, मार्गदर्शन व प्रात्यक्षीकाचे आयोजन करणे.                 

            11 सप्टेंबर- अंगणवाडी केंद्रामध्ये दुषित पाण्यापासून होणारे आजार, गरोदर व स्तनदा माता व कुटूंबामध्ये याबाबत जनजागृती निर्माण करणे, डायरीया झालेल्या बालकांसाठी पोषण व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणे. 12 सप्टेंबर- बालकांमध्ये बुटकेपणा, तीव्र कुपोषितपणा, ॲनिमिया, जंत, कमी वजन, प्रतिकारशक्ती कमी असणे या बाबींना टाळण्यासाठी कुपोषण रोखण्यासाठी आयुष संदर्भातील विविध उपक्रम व साहित्याचा वापर करुन विविध शिबीरांचे आयोजन करणे. 13 सप्टेंबर- हात धुणे व वैयक्तिक स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रमाचे अंगणवाडी, ग्रामपंचायत व शाळास्तरावर आयोजन करणे. 14 सप्टेंबर- अंगणवाडीस्तरावर विविध पौष्टीक आहाराचे पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करुन आहाराबाबत जाणिव जागृती मोहिम राबविणे. 15 सप्टेंबर- बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने होणाऱ्या आजारापासून बचावाबाबत अंगणवाडीमध्ये मार्गदर्शन करणे. 16 सप्टेंबर- किशोरवयीन मुलींकरीता मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करणे. 17 सप्टेंबर- गरोदर व स्तनदा माता यांच्याकरीता स्तनपाना संदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करणे. 18 सप्टेंबर- पोषण समुपदेश केंद्रामध्ये बालकांना दाखल करणे. 19 सप्टेंबर- पोषण घटकांची कमतरता त्यामुळे होणारे दुष्परीणाम याबाबत वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व पोषण प्रश्नोत्तरीचे आयोजन करणे. 20 सप्टेंबर- सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करणे.

         21 सप्टेंबर- गावपातळीवर बडी मदर्स कॉन्सेप्टचे प्रमोशन करणे. 22 सप्टेंबर- बालकांमधील मधुमेह शोधण्याकरीता तपासणी करणे. 23 सप्टेंबर- ग्रामस्तरावर जन्मलेल्या मुलींचे स्वागत, पालकांचे सत्कार व मुलींच्या नावाने वृक्षारोपण करणे. 24 सप्टेंबर- गावपातळीवर महिला ग्रामसंघ व बचतगटांच्या पदाधिकारी यांची गरम ताजा आहाराबाबत चर्चा करणे. 25 सप्टेंबर- गरोदर स्त्रिया यांचे आयएफए गोळयांचे नियमित सेवनाबाबत व पोषणाबाबत समुपदेशन करणे. 26 सप्टेंबर- गावस्तरावर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविका यांच्या गृह भेटीतून स्थानिक पोषक आहाराबाबत जनजागृती करणे व गृह भेटी देणे. 27 सप्टेंबर- अंगणवाडीस्तरावर ऑनलाईन पूर्व शालेय शिक्षण कृती करणे. 28 सप्टेंबर- बालकांचे लसीकरण नियमित व वेळेवर करणे. 29 सप्टेंबर- स्तनपानाबाबत जनजागृती करणे आणि 30 सप्टेंबर रोजी सर्व विभागाकडून पोषण अभियान प्रतिज्ञा घेणे व पोषण महिना समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसमुना पंत व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी दिली.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे