सामाजिक न्याय दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगरुळपीर येथील मुलींच्या वसतिगृहाचे दूरदृश्यप्रणालीव्दारे लोकार्पण



सामाजिक न्याय दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

मंगरुळपीर येथील मुलींच्या वसतिगृहाचे दूरदृश्यप्रणालीव्दारे लोकार्पण

                                                                         

        वाशिम, दि. 26 (जिमाका) :  राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांसमोर मोठी आव्हाने असताना त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. खेडोपाडी शाळा सुरू करीत वसतीगृह संकल्पना आणली. त्यामुळे वसतिगृह संकल्पनेचे जनक म्हणूनही त्यांना संबोधले जाते. तसेच त्यांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

           मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथून दुरदृश्यप्रणालीव्दारे मंगरुळपीर येथील नव्यानेच बांधण्यात आलेल्या 100 क्षमतेच्या मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चेंबुर येथे आयोजित कार्यक्रमातून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते चेंबूर येथील 1 हजार मुलां-मुलींची विभागस्तरावरील वसतीगृहापैकी 250 मुलींच्या वसतीगृहाच्या इमारतीचे उदघाटन देखील करण्यात आले. तसेच यावेळी येरवडा संकुल, पुणे येथील बार्टीच्या संघ लोकसेवा आयोगाच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाविद्यालयांसाठी समान संधी केंद्र उपक्रमांच्या मोबाईल ॲपचे उदघाटनही करण्यात आले.       

           मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची तर मंगरुळपीर येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या वसतीगृहातील उदघाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, जिल्हा परिषद सदस्य दौलतराव इंगोले, समाज कल्याणचे अमरावती विभागाचे उपायुक्त सुनिल वारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विनोद पट्टेबहादूर, सामाजिक कार्यकर्त्या वनमाला पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते सुहास हातोलकर, समाज भूषण राम दिंडोळे, इमारतीचे कंत्राटदार विशाल बजाज, वसतीगृह समितीचे सदस्य श्री. मनवर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. 

         मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या मंगरुळपीर येथील वसतीगृहाची मान्य संख्या ही 75 असून नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीची क्षमता 100 विद्यार्थीनींची आहे. या इमारतीच्या बांधकामावर 10 कोटी 51 लक्ष 63 हजार 600 रुपये खर्च करण्यात आला आहे. या वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थीनींना नास्ता, दोनवेळचे भोजन, निर्वाह भत्ता, प्रत्येक खोलीमध्ये 4 विद्यार्थीनींची निवास व्यवस्था असून या वसतीगृहामध्ये 27 खोल्या बांधण्यात आल्या आहे. प्रत्येक खोलीमध्ये 4 पंखे, शौचालय, स्नानगृह आणि स्नानगृहामध्ये आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, विनामुल्य शैक्षणिक साहित्य, व्यावसायीक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीकरीता स्टेशनरी रक्कम 4 हजार रुपये, गणवेश 500 रुपये, गमबुट छत्री करीता 500 रुपये प्रत्येक विद्यार्थीनीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

          विद्यार्थीनीकरीता मनोरंजन कक्ष, अभ्यासीका, वाचनालय, विद्यार्थीनीच्या सुरक्षेकरीता सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थीनीना पिण्याकरीता शुध्द पाणी, आधुनिक व्यायाम शाळा व क्रिडांगण आदी सोयी-सुविधा येथे उपलब्ध्‍ा होणार आहे.     

         मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यातील विविध समाज घटकातील सनदी अधिकारी व्हावेत यासाठी ‘बार्टी’‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांमधून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. राज्य शासन अनुसूचित जातीजमाती व बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविली आहे. सामाजिक न्यायउच्च व तंत्रशिक्षणआदिवासी विकासइतर मागास विभागशालेय शिक्षण विभागकौशल्य विकास आदी विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेतअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

           सचिव श्री. भांगे यांनी प्रास्ताविकात सांगितलेसमाजकल्याण विभागाची 1932 मध्ये स्थापना झाली असून राज्याच्या या विभागास सर्वसाधारणपणे आता 90-91 वर्षाचा कालखंड झालेला आहे. अशा या ऐतिहासिक विभागामार्फत राज्य शासन अनुसूचित जातीअनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक संवर्धनासाठी काम करते. परदेशातील उच्च शिक्षणासाठी राज्य शासन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करते. दरवर्षी विभागाच्या ४४१ वसतिगृह २,३३८ अनुदानित वसतिगृह व ९० निवासी शाळामार्फत १.५ लक्ष विद्यार्थ्यांना शिक्षणभोजन व निवासाची सोय करण्यात येते. समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी आभार मानले.

वसतिगृह व मोबाईल ॲपविषयी माहिती

            मुंबई शहरामध्ये 250 क्षमतेच्या वसतिगृहाचे सुरू करण्यात आले. नजीकच्या काळात आणखी 750 विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सहा महिन्यांत सूरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात 1300 मुले व 350 मुलींसाठी वसतिगृहाची उपलब्धता होणार आहे. चेंबूर येथे उभारण्यात येत असलेले हे वसतिगृह 1000 क्षमतेचे असून त्याचे बांधकाम बीओटी तत्वावर झालेले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना भोजनशैक्षणिक सुविधासुरक्षित निवास याबरोबरच शैक्षणिक/इंटरनेट, संगणक सुविधाग्रंथालय सुविधाकरमणुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत.

              मंगरुळपीर येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड, समाज कल्याण निरीक्षक ए.बी. चव्हाण, मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल वर्षा लाकडे, कल्पना पोहरे, वाशिम येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचे गृहपाल शेषराव इंगोले, हरिष वानखेडे यांचेसह बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार हरिष वानखेडे यांनी मानले. यावेळी वसतीगृहातील मुलींची तसेच मंगरुळपीर येथील सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.  

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर