यंत्रणांनी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे षण्मुगराजन एस.




यंत्रणांनी प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे

                                                               षण्मुगराजन एस.

शासन आपल्या दारी उपक्रमाचा आढावा

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : ‘ शासन आपल्या दारी ' हा शासनाचा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम या उपक्रमांतर्गत निश्चित केले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात राहणारे नागरीक हे शासनाच्या योजनांचे लाभार्थी आहे. या लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टिने प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत शासकीय यंत्रणांनी पोहचावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.   

            आज 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ‘ शासन आपल्या दारी ' या उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी अपुर्वा बारसु, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, राजेश सोनखासकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड व प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, या उपक्रमाची ग्रामीण व शहरी भागात व्यापक प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी बॅनर व पोस्टर्स लावण्यात यावे. घरोघरी जावून यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी योजनांची लाभार्थ्यांना माहिती दयावी. त्यामुळे लाभार्थी आपल्यासाठी कोणत्या योजनांचा लाभ घेता येईल हे निश्चित करतील. संबंधित योजनेचे त्यांच्याकडून अर्ज भरुन घ्यावे. या उपक्रमांतर्गत हर घर दस्तकसाठी नियोजनपूर्वक घरोघरी भेटी दयाव्यात. कोणताही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील 100 टक्के गावे या उपक्रमात सहभागी व्हावीत यासाठी यंत्रणांनी त्यांच्यापर्यंत पोहचावे. गावपातळीवर यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी गावात पोहचले याची माहिती संपूर्ण गावातील लोकांना झाली पाहिजे. तेंव्हाच आपला हा उपक्रम यशस्वी करता येईल. आयुष्यमान भारत व आभा कार्डचे सर्व पात्र लाभार्थ्यांना वितरण या उपक्रमांतर्गत करण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमादरम्यान लाभार्थ्यांचे किती नवीन अर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी प्राप्त होतात. त्यावर तातडीने कार्यवाही करावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, मंडळ अधिकारीस्तरावर शिबीराचे नियोजित तारखेला आयोजन करावे. वस्तू स्वरुपात ज्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, त्याची यंत्रणांनी यादी तयार करुन ठेवावी. यंत्रणांनी लाभार्थी निवड प्रक्रीया आता पूर्ण करुन ठेवावी. विविध घटकनिहाय यादी तयार असावी. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे याची यादी तयार करावी. प्रत्येक दिवशी या उपक्रमांतर्गत करण्यात आलेली कार्यवाही दररोज न चूकता सादर करावी. यंत्रणांनी शिबीराची माहिती लोकप्रतिनिधींना देवून त्यांना या उपक्रमात सहभागी करुन घ्यावे. असे ते म्हणाले.

श्रीमती पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातील नागरीकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. यंत्रणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर ग्रामस्थांना पूर्व सूचना देवून त्यांना एकत्र करुन योजनांची माहिती दयावी. त्यामुळे मोठया प्रमाणात लाभार्थी लाभ घेण्यासाठी पुढे येतील. आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्डचे लाभार्थी मोठया संख्येने असून या उपक्रमादरम्यान सर्व लाभार्थ्यांना हे कार्ड वितरीत होईल यादृष्टीने आरोग्य विभागाने काम करावे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. देवरे म्हणाले, हर घर दस्तकचे यंत्रणांनी नियोजन करावे. योजनांचा कोणताही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गावपातळीवर योजनांची माहिती देतांना लाभार्थ्यांना ती समजेल व तो लाभ घेण्यास प्रवृत्त होईल. तसेच त्याचे अर्ज भरुन घ्यावे. असे त्यांनी सांगितले.

कारंजा गटविकास अधिकारी श्री. पडघान यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अनुषंगाने कारंजा तालुक्यात करण्यात आलेल्या तयारीचा व आतापर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची माहिती यावेळी दिली. कारंजा तालुक्यातील 12 हजार कुटूंबापर्यंत कर्मचारी पोहचले असून लाभार्थ्यांना भेटून योजनेच्या लाभासाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहे. 2300 अर्ज हर घर दस्तक अभियानातून प्राप्त झाले आहे. ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका हे गावोगावी जावून भेट देत आहे. लोकप्रतिनिधीसुध्दा या उपक्रमात सहभागी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. कोवे, जिल्हा रोजगार व स्वयंरेाजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, कोषागार अधिकारी श्री. खारोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. आकोसकर, श्री. मापारी यांच्यासह सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.     

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे