मधमाशा पालन : पात्र लाभार्थ्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले




मधमाशा पालन : पात्र लाभार्थ्यांकडून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

          वाशिम, दि. 09 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती/ संस्थांकडून पुढीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्विकारण्याची तारीख १० ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

         योजनेची वैशिष्टय -  मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद, प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.

          योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता - वैयक्तिक मधपाळ पात्रता - अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. जिल्हास्तरावर १० दिवसाचे प्रशिक्षण व १० मधपेटया व ईतर साहित्य घेणे अनिवार्य. (उदा. ५० टक्के स्वगुतंवणुक २७ हजार रुपये जमा केल्यानंतर ५४ हजार रुपयांचा साहित्य पुरवठा केला जातो).

          केंद्रचालक प्रगतशिल मधपाळ-व्यक्ती पात्रता - किमान इयत्ता १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त अशा व्यक्तिीच्या कटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. महाबळेश्वर येथे २० दिवसाचे प्रशिक्षण व ५० मधपेटया व ईतर साहित्य घेणे अनिवार्य आहे. (उदा.५० टक्के स्वगंतवणुक १ लक्ष ५ हजार ५००/- जमा केल्यानंतर २ लक्ष ११ हजार रुपयाचे साहित्य पुरवठा केल्या जाते).

          केंद्र चालक संस्था पात्रता - संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १ हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी. महाबळेश्वर येथे २० दिवसाचे प्रशिक्षण व ५० मधपेटया व ईतर साहित्य घेणे अनिवार्य.

         शास्त्रीय पध्दतीने आग्यामध संकलन प्रशिक्षण - पारंपारीक आग्या मध संकलन करणारे कारागिरास प्रथम प्राधान्य. पाच व्यक्तीचा एक समुह आवश्यक. एका तालुक्यातुन किमान चार समुह आवश्यक.

          छंद/विशेष प्रशिक्षण पात्रता - पाच दिवसाचे जिल्हास्तरावर प्रशिक्षण अनिवार्य. शेतकरी, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, शासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यासाठी प्रवेश फी २७ रुपये कमीत कमी दोन मधपेटया स्वखर्चाने घेणे अनिवार्य आहे.

           अटी व शर्ती :-लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंद पत्र लिहुन देणे अनिवार्य राहिल, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दागडीया सदन, तहसील कार्यालयासमोर, वाशिम येथे डी. एस. राउतराव (९६८९२००२३९) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे