एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय बैठकीत मंथन राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच विविध कारणांमुळे एकल जीवन जगणाऱ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र व सर्वसमावेशक एकल महिला धोरण तयार करत आहे. या धोरणात तळागाळातील महिलांच्या समस्या, अनुभव आणि अपेक्षांचा समावेश व्हावा या उद्देशाने वाशिम येथे जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेशीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नवीन योजनांची आवश्यकता, विद्यमान योजनांमधील सुधारणा तसेच धोरणात्मक बदल याबाबत उपस्थितांनी मौल्यवान सूचना मांडल्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, जिव्हाळा फाउंडेशनच्या अश्विनी अवताडे, क्षितिज फाउंडेशन, मंगरूळपीरचे अतुल राऊत, सामाजिक कार्यकर्त्या वनमाला पेंढारकर, शांतीनिकेतन महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा वैशाली आरू, अपर्णा सेवाभावी संस्थेच्या अपर्णा जायभाये, जिल्हा उद्योग केंद्राचे उमेश पायघन, माविमच्या कार्...