पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'चे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांकडून स्वागत
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'चे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांकडून स्वागत
कर्जमुक्तीमुळे शेतीला नवी ऊर्जा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : प्रगतिशील शेतकऱ्यांचा विश्वास
वाशिम, दि.२८ जुन (जिमाका): राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' या महत्त्वाकांक्षी योजनेचे वाशिम जिल्ह्यातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देतानाच आधुनिक, शाश्वत आणि प्रगत शेतीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त हेमंत वसंतराव देशमुख (डोंगरकिन्ही, ता. मालेगाव) यांनी सांगितले की, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ हा राज्य शासनाचा दूरदृष्टीचा निर्णय आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल. कर्जमुक्तीमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढीकडे अधिक लक्ष देऊ शकतील. ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरेल."
राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त श्रीमती ललिता विश्वास गोदमले (रामगाव मोतसावंगा, ता. मंगरूळपीर) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळेल. कर्जाचा ताण कमी झाल्याने शेतकरी नव्या उमेदीने शेतीकडे वळतील आणि शेती विकासाला चालना मिळेल."
राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त केशव मोतीराम भगत (चांभई), ता. मंगरूळपीर) यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल, शेतीमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची क्षमता निर्माण होईल आणि उत्पादनवाढीसह ग्रामीण विकासालाही गती मिळेल. ही योजना शेतकऱ्यांसाठी नवी आशा निर्माण करणारी ठरेल."
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी या योजनेमुळे शेती क्षेत्राला आर्थिक बळ मिळण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शासनाच्या या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना नव्या जोमाने शेती करण्याची संधी उपलब्ध होणार असून उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्तीची योजना नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया ठरणार असल्याची भावनाही जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment