13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत



13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत

       वाशिम, दि. 19 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा न्यायालय येथे आणि तालुका विधी सेवा समिती व तालुका विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्तवतीने तालुका न्यायालय येथे 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात येणार आहे. तरी न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्याकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा.

         या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे कर्ज व वसूली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, पराक्राम्य विलेख अधिनियम (निगोशिएबल इन्ट्रुमेंट्स ॲक्ट) च्या क-138 खाली दाखल झालेली प्रकरणे, महसूलबाबतची प्रकरणे, कामगार वाद, वन कायदा व इतर सर्व तडजोडपात्र प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवता येणार आहे.

         राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायाधिश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ मदत करणार आहे. कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. लोक न्यायालयाच्या निवाडयाविरुध्द अपील करता येणार नाही. न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यामध्ये साक्षी, पुरावे, उलट तपासणी व दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानूसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम येथे 07252-231455 आणि तालुका विधी सेवा समिती, मालेगांव 07254-271015, रिसोड 07251-222294, मानोरा 07253-263711, मंगरुळपीर 07253-260210 आणि कारंजा 07256-222330 यावर संपर्क साधावा. येत्या 13 ऑगस्ट रोजी जिल्हयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत आपली जास्तीत जास्त प्रकरणे पक्षकारांनी सामंजस्यांने मिटवावीत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अमोघ कलोती व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजयकुमार टेकवाणी यांनी केले आहे.  

                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे