लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ लाभार्थ्यांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले
- Get link
- Other Apps
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ
लाभार्थ्यांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले
वाशिम, दि. ०6 (जिमाका) : जिल्ह्यातील मातंग समाजाच्या युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता व समाजातील लोकांचे जीवनमान उंचाविण्याकरीता शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत मातंग समाजातील १२ पोटजातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. चालु आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेअंतर्गत ५० हजार १ रुपयापासून ते ७ लक्ष रुपयापर्यंत जिल्ह्याला २० कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह २० टक्के व लाभार्थी सहभाग ५ टक्के तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग ७५ टक्के आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो व बँकेचा कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर असतो. अनुदान योजनेअंतर्गत ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येतात. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असुन उर्वरीत कर्ज बँकेचे असते. या योजनेचे ७५ कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीपैकी असावा, वयोमर्यादा १८ ते ५० असावी, कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, घरटॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा व प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत येऊन कर्ज प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे.एम.गाभणे यांनी केले आहे.
*******- Get link
- Other Apps
Comments
Post a Comment