रब्बी हंगाम पीक स्पर्धा शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन 31 डिसेंबर अंतिम मुदत

 


रब्बी हंगाम पीक स्पर्धा

शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

31 डिसेंबर अंतिम मुदत

 

वाशिम, दि. 14 (जिमाका) :  जिल्हयात पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा यासाठी पीक स्पर्धा रब्बी हंगाम 2021-22 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांकडू केला जाईल त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना फायदा होऊन जिल्हयाच्या तसेच राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. या उद्देशाने ही पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

जिल्हयाकरीता रब्बी पीक हंगामासाठी स्पर्धेत गहू व हरभरा या पीकाचा समावेश करण्यात आला आहे. प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 शेतकरी अशी आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पीकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पीकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहिर करतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पीकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटांसाठी पीकनिहाय प्रत्येकी 300 रुपये आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख गहू व हरभरा या पीकांसाठी 31 डिसेंबर 2021 आहे. स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज विहीत नमुन्यात भरुन त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलान, सातबारा, आठ-अ चा उत्तारा, आदिवासींसाठी जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे 31 डिसेंबरपूर्वी सादर करावे.

पीक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. तालुका पातळीवरील पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षिस 3 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस 5 हजार रुपये. विभाग पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 25 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस 15 हजार रुपये. राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस 30 हजार रुपये आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी वरील बक्षिसे निश्चित केली आहे.

पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायक/ कृषी पर्यवेक्षक/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. पीक स्पर्धेसाठी अर्ज 31 डिसेंबर 2021 पूर्वी सादर करावे. या पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश