डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून

31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

वाशिम, दि. 24 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरु केलेली आहे.

सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 मधील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या वर्षामध्ये अर्जांचे नुतनीकरणासाठी मागील सत्र परीक्षांची गुणपत्रिका व महाविद्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांची उपस्थिती व बोनाफाईड तसेच सन 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षानुसार स्वतंत्रपणे भाडे करारनामा व अर्जामध्ये नमुद इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

पात्रतेसंबंधी निकष पुढीलप्रमाणे- विद्यार्थी हा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. तो विद्यार्थी राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. या योजनेसाठी निवड करतांना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. जिल्हयाचे नगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नसावा. वाशिम शहर नगरपालिकेच्या हद्दीपासून किमान 5 कि.मी. पेक्षा कमी परिसरातील रहिवासी नसावा. इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी/पदवीका अभ्यासक्रम किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. विद्यार्थी हा इयत्ता 11 वी, 12 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/पदवीका, व्यावसायीक/बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला प्रवेशीत असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान 2 वर्षे असावा. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांगासाठी गुणवत्तेची टक्केवारी किमान 40 टक्के असावी. विद्यार्थ्यांनी प्रवेशित महाविद्यालयाचे जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करता येईल.

तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबर 2021 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांचेकडे सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.       

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश