कृषी विभाग : पारदर्शक व गतिमान लाभासाठी " एक शेतकरी एक अर्ज " उपक्रम यशस्वी

 

कृषी विभाग : पारदर्शक व गतिमान लाभासाठी

" एक शेतकरी एक अर्ज " उपक्रम  यशस्वी

            वाशिम, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभागामध्ये अनेक नविन उपक्रम व योजना सुरु केल्या आहेत. त्याचे दृश्य परिणाम  दिसू लागले आहेत.त्यापैकीच एक म्हणजे "एक शेतकरी - एक अर्ज "  पूर्वी शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता. प्रत्येक अर्जासोबत सारखीच कागदपत्रे जोडावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसाही खर्च व्हायचा.बऱ्याच वेळा मागणी केलेल्या घटकाचा लाभही मिळत नव्हता. तसेच लाभार्थी निवडतांना विविध स्तरावरच्या हस्तक्षेपामुळे योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नव्हत्या त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी असायची. यावर उपाय शोधत असतांना कृषि विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन महाडीबीटी प्रणाली विकसित करुन " एक शेतकरी- एक अर्ज " ही संकल्पना अंमलात आणली. या प्रणालीमुळे केवळ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेता येऊ लागले. शिवाय चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही तर हाच अर्ज पुढील आर्थिक वर्षात ग्राहय धरण्याची सुविधा देखील आहे.

               कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी या प्रणालीव्दारे शेतकरी घरबसल्या अर्ज करु शकतो. त्याचप्रमाणे,आपल्या अर्जाची सद्यस्थिती मोबाईल ॲपद्वारे पाहू शकतात.योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील अपलोड करू शकतात. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास संगणकीय सोडतीद्वारे प्रत्येक तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची पारदर्शी निवड केली जाते.अर्ज करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतचा प्रवास मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्णतः संगणकीकृत करून विकासाच्या योजना ऑनलाईन सोडत पद्धतीने राबविणारा कृषि विभाग राज्यातील पहिलाच विभाग असून विभागाच्या सर्व प्रमुख योजनांची अंमलबजावणी आता महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

               वर्षभरात जिल्हयात 1 लक्ष 13 हजार 527 शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी केली आहे. वेगवेगळ्या योजनांतर्गत विविध घटकांची मागणी करून कृषि विभागाच्या या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला आहे.वर्षभराच्या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांनी ही प्रणाली आत्मसात केली आहे. ही समाधानाची बाब आहे. 23 मार्च 2021 रोजी या प्रणालीव्दारे पहिल्या शेतकऱ्यास अनुदान वितरित झाले होते.आज वर्षभरानंतर जिल्हयातील एकूण 10 हजार 313 शेतकऱ्यांनी विविध घटकांची अंमलबजावणी पूर्ण केली आहे. कृषि विभागाने 10 हजार 313 शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर रु. 22 कोटी 46 लक्ष अनुदान प्रत्यक्ष डीबीटीव्दारे वर्ग केलेले आहे.उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च 2022 अखेर ही प्रक्रिया पुर्ण होईल. ही प्रणाली नाविन्यपूर्ण असल्यामुळे सुरुवातीला कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही प्रणाली समजून घेऊन कार्यवाही करण्यास थोडा वेळ लागला.परंतु ही प्रणाली समजावून सांगण्याकरिता वेळोवेळी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना वेळीच योजनांचा लाभ मिळावा म्हणून कृषि मंत्री, प्रधान सचिव (कृषि) व आयुक्त (कृषि) यांच्या स्तरावरून आढावा बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे ही प्रणाली वर्षभरातच सुरळीतपणे मार्गस्थ झालेली आहे. या प्रणालीमध्ये वापरकर्त्यांच्या गरजेनुरूप वरचेवर सुधारणा करण्यात आल्या आहे. महाडीबीटी प्रणाली अधिकाधिक शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी सुलभ करण्यात येत आहे. महाडीबीटी प्रणालीस शेतकऱ्यांनी दिलेला मोठा प्रतिसाद आणि वर्षभरातील अनुदान वितरणामध्ये कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान पाहता शेतकऱ्यांनी कृषि खात्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे.

               अल्पावधीत " एक शेतकरी एक अर्ज " हा उपक्रम व महाडीबीटी प्रणाली लोकप्रिय झाली आहे. या प्रणालीमुळे कृषि विभागाच्या योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने व सुलभरीत्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात कृषि विभाग यशस्वी झाला आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी कळविले आहे

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे