पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे - न्या. संजय शिंदे

 



पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे

                                                                                   - न्या. संजय शिंदे

              वाशिम, दि. 22 (जिमाका) : भावी पिढीच्या सोईसाठी आज प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल यासाठी क्षणोक्षणी चिंतन करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले.

             आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन जिल्हा न्यायालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन न्या. शिंदे बोलत होते. यावेळी न्या. आर. पी. कुलकर्णी, जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्षा ॲड. छाया मवाळ, सचिव ॲड. एन.पी. जुमडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष ॲड. समाधान सावळे, सहसचिव ॲड. विनोद सानप व  ॲड. गणेश लव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

             जल पुनर्भरण, जलसंवर्धन आणि प्रदुषणमुक्त पाणी व हवा मिळण्याचा अधिकार या विषयावर अॅड. गणेश लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुध्द होईल. त्यामुळे तो अनर्थ टाळावयाचा असल्यास आपण जलसंवर्धन करणे काळाची गरज आहे. अॅड. समाधान साबळे यांनी शासनाच्या समाजोपयोगी सेवा आणि योजना या विषयावर, न्या. आर. पी. कुलकर्णी यांनी व्यावसायीक वादामध्ये दाखलपुर्व मध्यस्थी आणि तडजोड या विषयावर मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन करतांना म्हणाले, व्यावसायीक वाद मध्यस्थीने मिटले तर लोकोपयोगी प्रकल्पांची कामे वेळीच पुर्ण होतील. त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल. त्यामधून रोजगार निर्मिती होण्यास देखील मदत होईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाला विधीज्ञ संघाचे पदाधिकारी व सदस्य, न्यायालयातील कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अॅड. एन. टी. जुमडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अॅड. विनोद सानप यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर