जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा दक्षता समितीचा आढावा

 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

जिल्हा दक्षता समितीचा आढावा

   वाशिम, दि. 24 (जिमाका) : सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित जिल्हा दक्षता समितीची सभा आज 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यांचे प्रतिनिधी व सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

    यावेळी ग्रामस्तरावर असलेल्या दक्षता समित्यांच्या बैठकांचा आढावा घेण्यात आला. तालुकास्तरीय दक्षता समित्या स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. षन्मुगराजन यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 2 लक्ष 4 हजार 13 लाभार्थी, प्राधान्य कुटूंब योजनेत 7 लक्ष 51 हजार 392 लाभार्थी, एपीएल शेतकरी योजनेचे 23 हजार 315 कार्डधारक असून लाभार्थी संख्या 97 हजार 825 असे यांची माहिती श्रीमती कोरे यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात नवीन शिधापत्रिकेसाठी 201, दुय्यम शिधापत्रिकेसाठी 110, नाव कमी करणे/ समाविष्ट करणे यासाठी 76  अर्ज  प्राप्त झाले. एकूण 387 अर्ज प्रलंबित असल्याने यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पुरवठा विभागाने पुढाकार घेवून ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी एका दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी तो प्रकाशित करावा. तसेच त्याबाबत प्राप्त तक्रारीची नोंद घेण्यासाठी कार्यालयात स्वतंत्र रजिष्टर ठेवण्यात यावे. असेही श्री. षन्मुगराजन यावेळी म्हणाले.

   यावेळी श्री. षन्मुगराजन यांनी जिल्ह्यातील गोदामाची माहिती, धान्य साठवणूक क्षमता व धान्यसाठा. जिल्ह्यातील रास्त भाव दूकानावर आतापर्यत झालेली कारवाई, रिक्त असलेल्या ठिकाणी रास्तभाव दूकानांचे जाहिरनामा, शहरी भागातील एकांक पध्दतीने रास्तभाव दूकान पुर्नरचना, जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र, रास्तभाव दूकान तपासाणीबाबतची माहिती आणि रास्तभाव दूकानावर केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. सभेला पुरवठा विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे