13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभिमानाने फडकवूया


13  ते 15 ऑगस्ट दरम्यान

घरोघरी तिरंगा अभिमानाने फडकवूया

                                            ·      ध्वज संहितेचे प्रत्येकाने पालन करावे

       जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांचे आवाहन

वाशिम, दि. 05 (जिमाका) : येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य लढयातील ज्ञात अज्ञात क्रांतीकारक/ स्वातंत्र्य सैनिक यांचे स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी. या उद्देशाने गौरवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान “ घरोघरी तिरंगा ”  या उपक्रमांतर्गत प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

“ घरोघरी तिरंगा ”  या उपक्रमांतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवतांना दररोज सायंकाळी राष्ट्रध्वज खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांना मात्र सुर्योदयानंतर ध्वजाची उभारणी करुन सुर्यास्तापूर्वी ध्वज खाली उतरावा लागेल. प्रत्येकाने ध्वज संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज हाताने कातलेला, हाताने बनविलेला किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सुत/पॉलीस्टर/लोकर/सिल्क व खादी कापडापासून तयार केलेला असावा.

राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती असावा. ध्वजाची लांबी व रुंदी 3:2 या प्रमाणे असावी. राष्ट्रध्वज फडकवितांना केशरी रंग आकाशाकडे वर असावा. हिरवा रंग जमीनीच्या दिशेने म्हणजे खाली असावा. राष्ट्रध्वजाच्या दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पुर्णत: मध्यभागी 24 आऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्र दिसेल असा ध्वज असावा. ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर लिहू नये. राष्टध्वज जमिनीवर अथवा पाण्यात पडणार नाही, अशा पध्दतीने फडकवावा. त्याचा वापर इमारत, टेबल अथवा कोणतीही वस्तू झाकण्यासाठी करता येणार नाही. राष्ट्रध्वजाचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही. खराब झालेला, फाटलेला, मळलेला व चुरगळलेला ध्वज फडकविता येणार नाही. कोणत्याही सजावटीसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करता येणार नाही. तिरंगाच्या ध्वज स्तंभावर अन्य कोणताही ध्वज किंवा ध्वजासोबत एकाच काठीवर फडकविता येणार नाही. राष्ट्रीय ध्वजाच्या उंचीवर अथवा समान उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकविता येणार नाही. ध्वजाचा वापर हात पुसणे, वाहन पुसणे, हात रुमाल, उशी व पोषाख म्हणून करता येणार नाही.

राष्ट्रध्वजाच्या वर किंवा समान स्तरावर कोणताही पताका, बोधचिन्ह, फुलांचा हार व इतर ध्वज एकाच काठीवर लावता येणार नाही. राष्ट्रध्वज फाटेल अशा पध्दीने लावू अथवा बांधू नये. ध्वज फडकवितांना काठीच्या वरील बाजूस टोकावर फडकविणे, मध्यभागी किंवा खाली फडकवू नये. ध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये यासाठी राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 च्या कलम 1 नुसार शिक्षा होवू शकते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रध्वज फडकवितांना ध्वजसंहितेचे पालन करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी केले आहे.    

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे