जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवार,गाळमुक्त शिवार व जलशक्ती अभियानाचा आढावा



जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवार,

गाळमुक्त शिवार व जलशक्ती अभियानाचा आढावा

        वाशिम, दि. 10 (जिमाका) : जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन एस. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलयुक्त शिवार अभियान- 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना विकास घटक- 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि जलशक्ती अभियान- 2023 या योजनांचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

          जलसाक्षरतेच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासोबतच मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करतांना उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान- 2.0, धरण व तलावांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरण/ तलावांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्यासोबतच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होण्यास मदत व्हावी यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना आणि अभिसरणातून जलसंधारणाच्या कामासाठी जलशक्ती अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे.

          यावेळी बोलतांना श्री. षण्मुगराजन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात पाच कामे या आठवडयात सुरु करावी. पाण्याचा टाळेबंद करुन आराखडे यंत्रणांनी तयार करावे. या अभियानामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना त्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण होवून पिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी देखील हातभार लागणार आहे. सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढला पाहिजे. जिल्हयातील ज्या 166 गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी करण्यात आली आहे त्या गावात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यात यावी. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित होईल असे ते म्हणाले.

           जिल्हयातील ज्या गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आली आहे. त्या गावातील ग्रामस्थांना या अभियानाची माहिती देण्यात यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, संबंधित गावच्या ग्रामपंचायतीचे हे अभियान राबविण्याबाबतचे ठराव घेण्यात यावे. या गावांमध्ये कामे करतांना सुक्ष्म नियोजन आराखडे तयार करावे. त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविता येईल. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेसाठी कामे करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात यावी. ग्रामस्थांना गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची माहिती व्हावी, यासाठी दवंडी देण्यात यावी. ग्रामस्थांना एकत्र करुन या योजनेचे महत्व पटवून दयावे. त्यामुळे लोकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. ज्या गावांच्या परिसरात तलाव आहे, त्या तलावातील गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकायचा आहे त्यासाठी संबंधित तहसिलदारांकडे अर्ज करावे. त्यामुळे तलावातील गाळ काढून शेतात टाकणे सोयीचे होईल असे त्यांनी सांगितले.

          जलशक्ती अभियानाला मुदतवाढ मिळाल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, यंत्रणांना अभिसरणातून या अभियानात मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीसह जलसंधारणाची कामे करता येईल. ज्या यंत्रणांनी या अभियानाचे आराखडे तयार केलेले नाही, त्यांनी तात्काळ आराखडे तयार करुन संबंधित पोर्टलवर अपलोड करावे. शासकीय इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे यंत्रणांनी करावी. जलसंधारण विभागाने प्रकल्पाच्या परिसरात वृक्ष लागवडीची कामे हाती घ्यावी. वन विभागाने मोठया प्रमाणात वनतळयांची कामे करुन भूजल वाढीसोबतच वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. पोर्टलबाबत काही अडचणी असल्यास मृद व जलसंधारण विभागाशी संपर्क साधावा. येत्या शुक्रवारपर्यंत यंत्रणांनी आपले आराखडे पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            सभेला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर. वानखडे, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक विपुल राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप कार्यकारी अभियंता निलेश राठोड, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, सर्व तहसिलदार, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, काही नगर पालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे