अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरावी. समाज कल्याण विभागाचे आवाहन




अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरावी

समाज कल्याण विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 08 (जिमाका) अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येते. केंद्र सरकार पुरस्कृत असलेली ही योजना ऑनलाईन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाने ऑनलाईन गुगल फॉर्म तयार करुन दिला आला आहे. सन 2022-23 या वर्षात अर्ज केलेल्या प्रत्येक मुलांची माहिती गुगल फॉर्मवर भरणे आवश्यक आहे.
          या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. शिष्यवृत्तीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना रोजगार करता येणार नाही अथवा विद्यार्थ्यांना पालकांच्या कामात मदत करता येणार नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी अपवादात्मक परिस्थितीबाबत प्रमाणित केल्याशिवाय पुढील वर्गात प्रवेश मिळत नसल्यास शिष्यवृत्ती खंडीत करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड असल्याबाबत पुरावा सादर करावा लागेल. आधार क्रमांक अधिकृत करण्याची प्रक्रीया पार पाडावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आधारसाठी नोंदणी केली नसेल, अशा विद्यार्थ्यांना आधार नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. विद्यार्थी शालेय शिस्तीचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास किंवा शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे शाळा व्यावस्थापनाच्या लक्षात आल्यास या योजनेचा लाभ देणे संपुष्टात येईल अथवा लाभ रद्द करण्यात येईल. योजनेच्या अटी व शर्तीचे विद्यार्थ्यांने उल्लंघन केल्याची खात्री झाल्यास ही शिष्यवृत्ती थेट रद्द करण्यात येईल. योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ईतर कोणत्याही प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमीत उपस्थितीबाबत वेळोवेळी जाहीर केलेले निर्देश लागु राहतील.

           हाताने मेहतर काम करणाऱ्या/ माणवी विष्ठांचे वहन करणाऱ्या व्यक्ती किंवा संबंधिस्त व उघडया गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती, अस्वच्छ व्यावसायाशी संबंध परंपरेने असलेले सफाई कामगार, कातडी कमावणाने व कातडी सोलणारे, कचरा गोळा करणारे/ उचलणारे, मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अॅक्ट २०१३ मधील कलम २ (१) (डी) नुसार धोकादायक सफाई व्यवसायात काम करणारे पालक असणे आवश्यक आहे.
          सर्व जाती धर्माचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेअंतर्गत अस्वच्छ व्यवसाय करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांनी ग्रामपंचायत क्षेत्राकरीता ग्रामसेवक व सरपंच आणि नगर पालिका क्षेत्राकरीता मुख्याधिकारी या प्राधीकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

           इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेले व वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति लाभार्थी ३ हजार रुपये आणि इयत्ता ३ री ते १० वी मध्ये शिकणारे व वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति लाभार्थी ८ हजार रुपये शिष्यवृत्ती  देण्यात येईल. यासाठी वसतीगृह अधिक्षकांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

          तरी संबंधीत शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांनी सन 2022-23 या वर्षात अर्ज केलेल्या प्रत्येक मुलांची माहिती गुगल फॉर्मवर भरणे अनिवार्य आहे. ही माहिती दोन दिवसाच्या आत तात्काळ भरण्यात यावी. जेणेकरुन मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेपासुन वंचित राहणार नाही. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे