समाज कल्याण कार्यालयातnछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी



समाज कल्याण कार्यालयात

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 19 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयेाजन करण्यात आले. उपस्थितांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नुकतेच राज्यगीत म्हणून स्विकृत केलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताचे गायन केले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

          प्रमुख वक्ते विशाल नंदागवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक राजे असून त्यांच्या विचारांची गरज आज सुध्दा असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला, शेतकरी तसेच सामान्य जनतेसाठी विविध उपाययोजना करुन त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. लोकशाहीची मुल्ये तेंव्हाच्या शिवशाहीमध्ये होती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहीत असतांना छत्रपती शिवरायांच्या विचाराचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर सर्वांनी केला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. 

          समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे दुरदर्शी राजे होते. जनता त्यांना आपले मानत असे सांगून त्यांना जाणता राजा सुध्दा म्हटले जात असे. शिवाजी महाराजांनी भारतीय नौका निर्मिती करुन भारतीय नौसेनेची उभारणी केली. त्यामुळे आपल्या समुद्रीय सीमा सुरक्षित झाल्या तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या पीकाच्या देठाला सुध्दा हात न लावण्याची सक्त ताकीद आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावून शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे सांगितले. 

          कार्यक्रमात जिल्ह्यातील समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक, तालुका समन्वयक, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. गजानन बारड यांनी राज्यगीताचा अर्थ उलगडून सांगितला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. संचालन विधी अधिकारी ॲड. किरण राऊत व आभार प्रा. वसंत राठोड यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित