पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तातडीने पुर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून कामांचा आढावा

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास

   आराखड्यातील कामे तातडीने पुर्ण करा

                 -पालकमंत्री शंभूराज देसाई

दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून कामांचा आढावा

वाशिम, दि. 9 (जिमाका) : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे मुख्य तिर्थक्षेत्र पोहरादेवी हे आहे. संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 100 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. तरी या आराखड्यातील कामे यंत्रणांनी तातडीने पुर्ण करावीत. असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री श्री.देसाई यांनी आज 9 जून रोजी श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकोलाचे अधिक्षक दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे एका वर्षाच्या आत पुर्ण करावी. ही कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. सुधारीत कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात यावे. या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मुख्य इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्यामुळे आता इमारतीच्या अंतर्गत सजावटीची कामे त्वरीत पुर्ण करण्यात यावी. मंत्रालयस्तरावरुन पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे पुर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही. असे त्यांनी सांगितले.

विकास आराखड्यातील 14 कोटी रुपयांची उर्वरित कामे त्वरीत सुरु करावी. असे सांगून श्री. देसाई म्हणाले, संबंधित यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन ही कामे निधीरीत वेळेत पूर्ण करावी. सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करतांना त्यामुध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहणार नाही. याबाबतची दक्षता घ्यावी. आराखड्यातील कामे करण्यासाठी मंजूर मर्यादित रकमेच्या अंतर्गत विविध बाबींसाठी जिल्हास्तरीय समितीने निधी खर्च करण्याचा निर्णय घ्यावा. निधी खर्च होताच उर्वरित निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे ते म्हणाले.

 आमदार श्री. राठोड म्हणाले, तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कार्य करतांना यंत्रणांनी कालमर्यादा निश्चित करुन कामे पुर्ण करावी. या आराखड्यातील कामे पुर्ण करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या समितीला पुर्ण अधिकार देण्याबाबतचे प्रधान सचिव (वित्त विभाग) यांच्या स्वाक्षरीचे पत्र काढण्यात आल्याचे श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. षन्मुगराजन यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीणा,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता मंगेश वैद्य, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत)विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता बोकडे व मानोरा तहसिलदार श्री. किर्दक यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे