अन्नधान्य,कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा : रब्बी हंगाम २०२३..३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

अन्नधान्य,कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा : रब्बी हंगाम २०२३

३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले 

वाशिम,दि.२२ (जिमाका) राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल.हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
         वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पिक स्पर्धा तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू, हरभरा,करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
            पीकस्पर्धेतील पीके  रब्बी पीके - ज्वारी,गहू,हरभरा, करडई व जवस (एकूण ०५ पिके)
पात्रता निकष : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
           अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,७/१२,८-अ चा उतारा,जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बैंक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्ज दाखल करण्याची     
       अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल.  ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस - ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रूपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० राहणार आहे.
          बक्षिस स्वरुप :
 स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार, दुसरे बक्षीस ३ हजार, तिसरे बक्षीस २ हजार , जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार, दुसरे ७ हजार, तिसरे ५ हजार, राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार, दुसरे बक्षीस ४० हजार, व तिसरे बक्षीस ३० हजार मिळणार आहे.
          दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.पिकस्पर्धेबाबत अधिक माहीतीकरीता शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे