केंद्राच्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीचे व लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. विकसित भारत संकल्प यात्रा तयारीचा आढावा

केंद्राच्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीचे व लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करा
            जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 
विकसित भारत संकल्प यात्रा तयारीचा आढावा 

वाशिम दि.२०(जिमाका) केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील ज्या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही, त्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीचे आणि लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन यंत्रणांनी करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.
                 आज २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे " विकसित भारत संकल्प यात्रेच्या " तयारीचा आढावा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून घेताना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, संजय जोल्हे,नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा ग्रामीण बँक व्यवस्थापक श्री दिलीप मोहापात्रा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे,प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वझिरे,दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी राम धनगर व आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्ह्यात २३ नोव्हेंबरला शुभारंभ होणार आहे.जिल्ह्यात ४ एलईडी व्हॅनच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देऊन व लाभार्थ्यांच्या मुलाखती दाखवून जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही त्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी योजनांचे अर्ज देखील लाभार्थ्यांकडून भरून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड, पीएम किसान कार्ड यासह केंद्र सरकारच्या अन्य योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन आगामी आचारसंहिता लक्षात घेता करावे. असे त्या म्हणाल्या.
                डिसेंबर २०२३ पर्यंत केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करावी असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून मिळणार आहे.तरी यंत्रणांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन आतापासूनच करावे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून यंत्रणांना काम करण्याची संधी आली असल्याचे त्यांनी सांगितले.
                निवासी उपजिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी विकसित भारत संकल्प यात्रा याबाबतची माहिती दिली. अद्यापही ज्या योजनांचा लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम २६ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना,पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड,हर घर जल स्वमित्र योजना,जनधन योजना,जीवन ज्योती विमा योजना,सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना,पीएम प्रणाम योजना याशिवाय स्कॉलरशिप योजना, एकलव्य मॉडेल निवासी शाळा,वन हक्क अधिकार तर शहरी भागासाठी पीएम स्वनिधी,पी.एम विश्वकर्मा,पीएम उजाला योजना, पीएम मुद्रा योजना,स्टार्ट अप इंडिया, आयुष्यमान भारत,पीएम आवास योजना,स्वच्छ भारत अभियान, सौभाग्य योजना व खेलो इंडिया यासह अन्य योजनाची माहिती व लाभ भविष्यात संबंधित लाभार्थ्यांना देण्याची नियोजन यंत्रणांना करावे लागणार असल्याचे श्री.घुगे यावेळी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे