बँक कर्ज मंजूरीसाठी पंधरवाडा 155 वैयक्तिक उद्योगांना अर्थ सहाय्य मिळणार

 

सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग

बँक कर्ज मंजूरीसाठी पंधरवाडा

155 वैयक्तिक उद्योगांना अर्थ सहाय्य मिळणार

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगाचे इच्छुक अर्जदारांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करुन त्यास बँक कर्ज मंजूरी मिळण्यास गती देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने 3 ते 18 जानेवारी या कालावधीत अन्न प्रकीया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. इच्छुक व्यक्ती, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणीच्या अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofip.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अर्ज करावे.

            आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना राज्यात सन 2020-21 पासुन राबविण्यात येत आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर राबविली जात आहे. जिल्हयासाठी तेलबिया, सोयाबीन, करडई, जवस, तिळ या पिकांची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के कमाल 10 लाख रुपये अनुदान देय्य आहे. गट लाभार्थी जसे स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुक यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय्य आहे. याशिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅडींग तसेच प्रशिक्षण या घटकांचाही लाभ देण्यात येणार आहे.

            सन 2021-22 या वर्षात या योजनेअंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी 155 वैयक्तिक उद्योगांना अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे. 5 जानेवारीपर्यंत 97 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी 75 सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहे. 55 आराखडे बँक कर्ज मंजूरीसाठी विविध बँकांकडे सादर करण्यात आले आहे. बँकांकडून 8 प्रकल्पांना कर्ज मंजूरी मिळाली आहे. सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी 10 जिल्हा संसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प आराखडे तयार करण्याचे सेवा शुल्क शासनाच्यावतीने अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम यांनी केले आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे