*कोविड-19 संसर्गाविषयी जाणीव जागृती कार्यक्रमासाठी कलावंताकडून अर्ज मागविले* 14 जानेवारी अंतिम तारीख

*कोविड-19 संसर्गाविषयी जाणीव जागृती कार्यक्रमासाठी कलावंताकडून अर्ज मागविले*
 
14 जानेवारी अंतिम तारीख

वाशिम दि.07 (जिमाका) कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी व त्याअनुषंगाने करण्यात येणारे लसीकरण याबाबत प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंताव्दारे समाजात जाणीव जागृती करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्ह्यात जाणीव जागृतीसाठी जिल्ह्यातील कलावंतांची निवडसूची तयार करण्यात येणार आहे. तरी, कलावंतांनी शुक्रवार 14 जानेवारीपर्यंत अर्ज संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा माहिती कार्यालय,प्रशासकीय इमारत, दुसरा माळा,रूम नं 202, काटा रोड, वाशिम येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले आहे.
            सदर अर्ज, पर्यटन व सांस्कृतिक कार्य ‍विभाग शासन निर्णय दि. 8 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोविड-19 संसर्गाविषयी जाणीव-जागृतीचे कार्यक्रम विविध लोककला प्रकारातील लोककलावंत, प्रयोगात्मक कला सादर करणाऱ्या कलाकारांकडून करण्यात येतील. तसेच कोरोनाविषयक जनजागृती कार्यक्रमाचे संनियंत्रण संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येईल. 
      ग्रामीण भागात ग्रामपंचायतस्तरावर समूह स्वरूपात किंवा एकल स्वरूपात कार्यक्रम सादरीकरण झाल्यानंतर गावातील तलाठी, ग्रामसेवक यांनी परिशिष्ट-क मधील विहित नमुन्यानुसार कार्यक्रम संपन्न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र कलाकारास देणे आवश्यक राहील. कलावंतांना मानधन मागणीचे अर्ज जमा करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागू नये, याकरिता असे अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयात स्वीकारले जातील. सदर मागणी पत्र जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे कमाल पाच दिवसात पाठविण्याची जबाबदारी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार यांची राहील.
कोविड-19 संसर्ग प्रतिबंध व लसीकरण जाणीव जागृती कार्यक्रमासाठी वासुदेव, बहुरुपी इ. एकल कलाकारास एका दिवसासाठी जास्तीत जास्त रुपये 500 मानधन प्रति कलाकार देय राहील. एका दिवसात एकल कलाकाराने किमान 3 सादरीकरण करणे आवश्यक आहे. एका एकल कलाकारास जास्तीत जास्त दहा दिवस कार्यक्रम देता येतील. म्हणजेच एका एकल कलाकारास एकूण जास्तीत जास्त 5 हजार रुपये मानधन मिळू शकेल.
दोन किंवा तीन कलाकारांच्या समूहास रोज कमीत कमी दोन सादरीकरण करणे आवश्यक राहील. समूहातील प्रत्येक कलाकारांना प्रति कार्यक्रम 500 रुपये इतके मानधन देय राहील. एका समूहास जास्तीत जास्त 10 कार्यक्रम सादर करता येतील.जाणीव-जागृतीचा प्रचार व प्रसार यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकाराला स्वतःच्या जबाबदारीवर सहभाग घेत असल्याचे हमीपत्र लिहून द्यावे लागेल. तसेच अर्जासोबत आधारकार्ड, बँकपासबुकची झेराक्स,यापूर्वी काम केल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.अर्ज संबंधित तहसील कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयात विहित वेळेत सादर करावे. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.असे कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे