कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा- ऊर्जामंत्री डॉ. राऊत

 


कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना  प्रोत्साहित करा- ऊर्जामंत्री डॉ. राऊत

 

वाशिम, दि. 19 (जिमाका) : कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  प्रोत्साहित  करण्यासाठी शेतकरी मेळावे घेण्यात यावे. तसेच ग्रामपंचायत पातळीवर बैठका घेऊन कृषी धोरण- 2020 ची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी. असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच वीज जोडण्यासाठी पैसे भरूनही आजवर कृषी पंप जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देशही यावेळी डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

               जिल्हयातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार सं
घाचे आ. अमित झनक यांच्या पुढाकाराने वाशीम जिल्ह्यातील वीज विषयक समस्यांचा आढावा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. डॉ. राऊत पुढे म्हणाले, कृषी पंपाच्या थकबाकीसोबतच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकर वीज जोडणी कशी मिळेल यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावे. यासाठी जिल्हा पातळीवर कृती आराखडा तयार करून त्याची धडक अंमलबजावणी करावी. महावितरणकडून विविध कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे कंत्राटदार कामे करण्यात हयगय करीत असतील अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत  यांनी  महावितरणला  दिले.

वाशीम जिल्ह्यात सध्या उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत 431 शेती पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे. पुढील महिन्यापर्यंत शिल्लक वीज जोडण्या पूर्ण करण्याचे उदिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. रिसोड आणि मालेगाव तालुक्यात वीज ग्राहकांना होत असलेल्या समस्येची माहिती महावितरणला आहे. या परिसरातील वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा मिळावा यासाठी दोन्ही तालुक्यात 5 एमव्हिए क्षमतेचे दोन वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. शिरपूर व जवळा येथे अतिरिक्त 5 एमव्हिए क्षमतेचे रोहित्र लावण्यात येणार आहे. बैठकीस संचालक (संचलन) संजय ताकसांडे, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, वाशीम मंडळाचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य व कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे