आज राष्ट्रीय मतदार दिवस मतदार घेणार प्रतिज्ञा

आज राष्ट्रीय मतदार दिवस

मतदार घेणार प्रतिज्ञा

           वाशिम, दि. 24 (जिमाका) :25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून दरवर्षी देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा मतदारांना ,विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे व सुलभरित्या त्यांची नांव नोंदणी करुन घेणे हा आहे. 25 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 12 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी सर्वसमावेशक,सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे.         कोवि‍ड आचारसंहीतेचे पालन करुन हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देखील साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था ,शैक्षणिक संस्था,नागरी सामाजिक गट, राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड,नेहरु युवा केंद्राच्या युवकांचा तसेच सेवाभावी संस्थेंचा यामध्ये सहाभाग राहणार आहे.

           राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांसाठी असलेली प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे आहे.आम्ही,भारताचे नागरिक,लोकशाहीवर निष्ठा ठेवुन,याव्दारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्ष पाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखु व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.ही प्रतिज्ञा यानिमीत्ताने आयोजित विविध कार्यक्रमात घेणार आहेत. मतदार दिवसाच्या निमीत्ताने  जिल्ह्यात आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वि‍तरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विविध ठिकाणी या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात मतदारांनी कोरोना मार्गदर्शक नियमांचे पालन करुन सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

  

*******

 


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे