18 वर्षे पूर्ण केलेल्यांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

18 वर्षे पूर्ण केलेल्यांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी

                         जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

 वाशिम दि.10 (जिमाका) लोकशाही व्यवस्थेत मतदाराचे स्थान महत्त्वाचे आहे. विविध निवडणुकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार हा मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये यासाठी १८ वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

       भारत निवडणूक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, आवश्यक त्या दुरुस्त्या वर नमूद केलेल्या कालावधीत करून घ्याव्यात. निवडणूक आयोगाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या नगरपालिका/ नगरपंचायती,जिल्हा परिषद/पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जशाच्या तशा वापरण्यात येणार आहे.मतदार यादी प्रभागनिहाय विभाजीत करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे,पत्त्यामध्ये किंवा नावात दुरुस्ती करणे इत्यादी प्रकारची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळण्यासाठी तसेच नावात किंवा पत्यामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ही चांगली संधी असल्याचे श्री.षण्मुगराजन यांनी सांगितले 

 

       १ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.षण्मुगराजन म्हणाले,प्रथमच मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.या ग्रामसभेत अस्तित्वात असलेल्या मतदारयादीचे वाचनही करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ हा त्यासाठी अर्हता दिनांक आहे.मतदार म्हणून नांव नोंदणीसाठी केवळ निवासाचा आणि वयाचा दाखला, तसेच स्वतःचे छायाचित्र असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे 

 

 प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी - १ नोव्हेंबर २०२१, प्रारूप मतदार यादयांवर दावे व हरकती दाखल करणे - १ ते ३० नोव्हेंबर २०२१, विशेष मोहिमांचा कालावधी - १३ नोव्हेंबर,१४ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे त्यांना नेमुन दिलेल्या मतदान केंद्रावर पुर्ण वेळ उपस्थित राहतील. विशेष ग्रामसभा - १६ नोव्हेंबर २०२१, दावे व हरकती निकालात काढणे - २० डिसेंबर २०२१ आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी करणे - ५ जानेवारी २०२२ असा आहे.

        ऑनलाईन नाव नोंदणीसाठी www.nvsp.in संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास - अर्ज क्रमांक ६, अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी - अर्ज क्रमांक ६ अ,इतर नावांबाबत आक्षेपासाठी किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी -अर्ज क्रमांक ७, मतदार यादीतील तपशीलमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी -अर्ज क्रमांक ८, एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास - अर्ज क्रमांक ८ अ

         निवासाचा दाखला म्हणून जन्म दाखला, भारतीय पारपत्र, वाहन चालक परवाना, बँक/ किसान/ पोस्ट पासबुक, शिधावाटप पत्रिका, प्राप्तिकर निर्देश पत्रिका, पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक, टपाल खात्यातर्फे प्राप्त टपाल /पत्र यापैकी कोणताही एक पुरावा.

         वयाच्या दाखल्यासाठी भारतीय पारपत्र,वाहन चालक परवाना, पॅन कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला, बारावी,दहावी,आठवी किंवा पाचवीची गुणपत्रिका,आधार कार्ड, २१ वयोगटातील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र -३ यापैकी कोणताही एक दस्तऐवज आणि ऑनलाइन नाव नोंदणीसाठी कागदपत्रे व छायाचित्रे दोन एमबीच्या आत असावेत. कागदपत्रांची व छायाचित्राची फाईल JPG/JPEG असावी.असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे. 

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे