गर्भवती महिला, बालकांच्या आहाराविषयी काळजी घ्या - हर्षदा देशमुख



·        ‘पोषण महिना’ अंतर्गत सरपंचांची कार्यशाळा
·        पोषण अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०७ : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या घरातील गर्भवती महीला व लहान बालकांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी संबंधित गावांच्या सरपंचानी पोषण अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. पोषण अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सरपंचांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पंचायत विभागाच्या सहाय्यक गट विकास अधिकारी शुभदा पाटील, विस्तार अधिकारी श्री. जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती देशमुख म्हणाल्या, पोषण अभियानामध्ये पोषक आहार आणि स्वच्छता याला अतिशय महत्व आहे. त्यामुळे सरपंचानी आपल्या गावामध्ये गर्भवती महिला, बालकांच्या आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करावे. तसेच पोषण अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या उपक्रमामध्ये आपला सक्रीय सहभाग द्यावा. पोषण अभियानात महिलांची भूमिका महत्त्वाची असून महिलांनी आपल्या घरातील गर्भवती महिला व बालकांच्या आहाराविषयी व परिसराच्या स्वच्छतेविषयी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, गर्भवती महिला व बालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून त्यांना सकस आहार दिला जावा.
यावेळी मार्गदशन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहुर्ले यांनी पोषण अभियान व पोषण महिना उपक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पोषण अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे कुपोषण थांबवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याकरिता गर्भवती महिला व बालकांची कशाप्रकारे काळजी घ्यावी, त्यांचा आहार, आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती पाटील, श्री. जाधव यांनीही यावेळी उपस्थित सरपंचांना पोषण अभियानाविषयी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे