केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते केनवड आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन






वाशिम, दि. २२ : ‘आयुष्मान भारत’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील केनवड येथे सुरु करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, पंचायत समिती सभापती छाया गवई उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. जावडेकर म्हणाले, ‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यतचे औषधोपचार मोफत देण्याचा क्रांतिकारी निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या योजनेचा लाभ देशातील सुमारे ५० कोटी लोकांना होणार आहे. तसेच याच योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दीड लाख आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाशिम जिल्ह्याचाही यामध्ये समावेश असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सिंचन व शेती विषयक सुविधा निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले.
खा. धोत्रे म्हणाले, केंद्र शासनाने प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला चांगला औषधोपचार मिळावा यासाठी, आयुष्मान भारत योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून वाशिम जिल्ह्यात सुरु झालेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे हजारो नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
खा. गवळी म्हणाल्या, जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेज सुरु होणार असल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच जिल्ह्यात सुरु झालेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे चागली आरोग्य सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध होणारअसल्याचे सांगून याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांचे आभार मानले.
आ. झनक व आ. पाटणी यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम श्री. जावडेकर यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्रातील विविध कक्षांना भेट देवून पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडुरंग फोपसे यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्रीय सेमी इंग्रजी शाळेच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमानंतर श्री. जावडेकर  यांनी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांसमवेत छायाचित्र काढले. शाळेच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या अभ्यास विषयक चित्रांचे व स्वच्छतेचे त्यांनी कौतुक केले.
शेलूबाजार येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन
            मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मंगरूळपीर पंचायत समिती उपसभापती सुभाष शिंदे, सदस्य विलास लांभाडे, उपसरपंच दत्तात्रय भेराणे, तोरणाळाचे सरपंच राहुल वानखेडे उपस्थित होते
            जिल्ह्यातील शेलूबाजार, आसेगाव (ता.मंगरूळपीर), किन्हीराजा (ता. मालेगाव), शेंदूरजना (ता. मानोरा) व केनवड (ता. रिसोड) या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची दर्जान्नोती करून त्यांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रुपांतरण करण्यात आले आहे. या पाच आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असलेल्या १२२ गावांतील १ लक्ष ७८ हजार ४८१ लोकांना आरोग्यवर्धिनी केंद्राच्या सेवेचा लाभ मिळणार आहे.
*****


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे