तोंडगाव येथे पाककृती प्रदर्शनी, सदृढ बालक स्पर्धा उत्साहात




·        पोषण अभियान अंतर्गत आयोजन
वाशिम, दि. ०७ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पोषण अभियान अंतर्गत पोषण महिना राबविला जात असून ७ सप्टेंबर रोजी तोंडगाव येथे पाककृती प्रदर्शनी व सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण समितीचे सभापती चक्रधर गोटे होते.
यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पंचायत समिती सदस्य मंगलाताई गोटे, सरपंच सुरेखा गोटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डावरे, डॉ. नासीर, महिला व बालकल्याणचे विस्तार अधिकारी मदन नायक, आरोग्य विभागाचे सुभाष कव्हर, शेख अहमद, श्री. मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमती देशमुख म्हणाल्या की, पोषण अभियान अधिकाधिक व्यापक होवून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. याकरिता प्रत्येक घराघरात जागृती होणे आवश्यक आहे. पाककृती प्रदर्शनीच्या माध्यमातून पोषक आहाराविषयी जनजागृती होण्यास मदत होईल.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहुर्ले यांनी पोषण अभियानामध्ये सर्व विभाग यांनी एकत्र येऊन लोकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करून भविष्यात कुपोषण होणार नाही, याकरिता खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर म्हणाले, पोषण अभियान दरम्यान हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य तपासणी होत आहे. गर्भवती महिला, बालकांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.  ० ते ६ वयोगटातील बालक, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना यांना पोषण अभियानामध्ये परीपूर्ण आरोग्य व आहाराची माहिती दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी शिक्षण सभापती श्री. गोटे यांनी आहार व आरोग्याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विविध पदार्थांची पाककृती तयार करून प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. तसेच सुदृढ बालक स्पर्धेत सहभागी माता व बालकाचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पर्यवेक्षिका अमिता गिर्हे यांनी केले. करुणा बडगे, मीनाक्षी सुळे, केंद्रप्रमुख विलासराव गोटे, श्री. गायकवाड व सर्व शिक्षक व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे