आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते शुभारंभ
·
जिल्ह्यातील सुमारे १
लक्ष ३५ हजार कुटुंबांना मिळणार लाभ
·
प्रति कुटुंब ५ लक्ष
रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार
वाशिम, दि. २३ : देशातील गरीब कुटुंबांना मोफत
आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र
सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा
जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात योजनेच्या
लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. झारखंडची
राजधानी रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आयुष्मान
भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी
सभागृहात उपस्थितांनी बघितले.
यावेळी जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)चे सहाय्यक संचालक डॉ. दीपक
सेलोकार, डॉ. हेडाऊ उस्पस्थित होते.
आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये
वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ लक्ष १६ हजार व शहरी भागातील १९ हजार असे
एकूण १ लक्ष ३५ हजार कुटुंबांचा समावेश आहे. या कुटूंबांना प्रतिवर्षी ५ लक्ष
रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवांचा लाभ मोफत मिळणार आहे. यामध्ये १ हजार पेक्षा अधिक
विविध औषधोपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
सन २०११ मधील
सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेनुसार ग्रामीण भागातील घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील
कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी ७ वर्गातील कुटुंबांचा
तसेच शहरी भागातील कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर,
कारागीर इत्यादी ११ वर्गातील कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र
लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना ई-कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून या ई-कार्डद्वारे
त्यांना सर्व शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये यासह अंगीकृत
रुग्णालयांमध्ये औषधोपचार मिळणार आहेत. आजपासून राज्यातील ८० शासकीय
रुग्णालयांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी
कुटूंबातील सदस्य संख्या, वय व लिंग यावर कोणतेही बंधन असणार नाही, असे
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी यावेळी योजनेची माहिती देताना सांगितले.
आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे
लाभार्थी सुमन नायबराव पतंगे, संतोष बालाजी मड्डी, सुभाषचंद्र शर्मा, सुजीता संजय
इंगळे, छाया श्याम राऊत, अशोक बालाजी मड्डी यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते योजनेच्या
ई-कार्डचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन
योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक यांनी केले तर आभार वैभव राऊत यांनी
मानले.
Comments
Post a Comment