सिंचन विहिरी पूर्ण करण्याच्या कामास गती द्या - खासदार भावना गवळी


·         ‘दिशा’ समितीच्या बैठकीय विविध योजनांविषयी चर्चा
·         ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना
·         आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते विकास योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा
वाशिम, दि. १४ : शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या विहिरींची कामे जलद गतीने होणे आवश्यक आहे. ही कामे विहित कालावधीत होण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करून विहिरी पूर्ण करण्यासाच्या कामास गती देण्याच्या सूचना खासदार भावना गवळी यांनी दिल्या. १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)च्या सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, मानोरा पंचायत समितीच्या सभापती धनश्री राठोड, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक नितीन माने, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
खा. गवळी म्हणाल्या, शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आली आहेत. मात्र या कामांना आवश्यक गती मिळत नसल्याने विहिरी पूर्ण होण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे संथगतीने सुरु असलेली विहिरींची कामे गतिशील करण्यासाठी पंचायत समितीस्तरावर गट विकास अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ११ कलमी कार्यक्रम राबवून वैयक्तिक लाभाची कामे करण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाची कामे मंजूर करण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम बनविण्यावर भर दिला जावा. सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून नागरिकांना सर्व आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देवून खा. गवळी म्हणाल्या की, कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. तसेच याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना तातडीने गॅसची जोडणी देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. याकरिता संबंधित वितरकांना सूचित करण्यात यावे, असे खा. गवळी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिन दयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, एकात्मिक पाणलोट कार्यक्रम आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.
*****


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे