पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे

पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे
             पालकमंत्री शंभूराज देसाई 

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

वाशिम दि.२५ (जिमाका) मान्सूनचे आगमन यावर्षी लवकर होत आहे.सामान्य माणसाला पावसाळ्याच्या दिवसात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही यासाठी नाल्यांची साफसफाई व आरोग्य केंद्रात आवश्यक तेवढा औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात गावांना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात यावा. पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.   
         आज २५ मे रोजी मंत्रालयातून पालकमंत्री श्री.देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नैसर्गिक आपत्ती व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे,कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख,जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. ठोंबरे,महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ प्रशांत घावडे यांचेसह अन्य  विभाग प्रमुख उपस्थित होते.
          श्री.देसाई म्हणाले,शहरी भागातील जुन्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात यावे. पावसाळ्याच्या दिवसात नागरी भागातील सांडपाण्याची भूमिगत व खुली गटारे ओव्हरफ्लो होऊन रोगराई पसरते.त्यामुळे तातडीने गटारांची सफाई करण्यात यावी. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या वादळामुळे वीज पुरवठा खंडित होतो. तो वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीची पथके तयार ठेवावीत. तहसील कार्यालयात कंट्रोल रूम त्वरित सुरू करून तेथे रात्रपाळीमध्ये तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या सेवा घ्याव्यात. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सार्वजनिक  प्रसिद्ध करावे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना अडचणीच्या प्रसंगी त्यांना संपर्क साधता येईल, असे त्यांनी सांगितले.
           ज्या तीन गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडतो त्या गावांना आवश्यक तेवढे धान्य आताच उपलब्ध करून द्यावेत असे सांगून श्री.देसाई म्हणाले, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचे ४७ कोटी रुपये निधी त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री यांची लवकरच भेट घेऊन निधीची मागणी करण्यात येईल. पोलीस विभागाला देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग आपत्तीच्या काळात मदतीसाठी करण्यात यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध असावा.त्यामुळे रोगराईला आळा घालता येईल. आरोग्य केंद्रात रात्रपाळीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात रुग्णांसाठी मेडिकल ऑफिसर उपलब्ध असावे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी.मेडिकल ऑफिसरचे मोबाईल लोकेशन तपासावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून न येणाऱ्या मेडिकल ऑफिसरवर तातडीने कारवाई करावी असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन म्हणाले,जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होणारी स्थिती नसली तरी आपण तयारी केली असून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. नदीकाठावरील गावांच्या उपाययोजनेसाठी प्रशासन सज्ज आहे. बचाव पथकाकडे आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असल्याची खात्री केली आहे. वाशिम व कारंजा नगरपालिका क्षेत्रातील जीर्ण झालेल्या धोकादायक वेशीच्या परिसरात अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येईल. नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील ६० टक्के नालेसफाईची कामे करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात आल्याचे ते म्हणाले. 
         श्रीमती पंत यांनी जुन्या शाळा व अंगणवाडीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून आवश्यक त्या इमारतीची रिपेरिंगची कामे सुरू असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा पावसाळ्याच्या दिवसात रोगराई पसरू नये यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
          श्री.सिंह यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचे सांगून पावसाळ्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे