नाथ समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध बच्चू कडू कारंजा येथे नाथ समाज मेळावा
नाथ समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध
बच्चू कडू
कारंजा येथे नाथ समाज मेळावा
वाशिम दि.२९ (जिमाका) भटका असलेला नाथ समाज हा दुर्लक्षित आहे.समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजे.शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही हे लक्षात घेतले पाहिजे.शिक्षण व उद्योगाची समाजाने कास धरावी.अनावश्यक खर्च टाळून पैश्याची बचत व्हावी यासाठी सामूहिक विवाह मेळावे आयोजित करावे.नाथ समाजाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही इतर मागास व बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
आज २९ मे रोजी कारंजा (लाड) येथे बाबासाहेब धाबेकर सभागृहात आयोजित वैदर्भीय नाथ समाज संघाच्या नाथ समाज मेळाव्याचे उद्धाटक म्हणून श्री.कडू बोलत होते.यावेळी सुनिल धाबेकर, दामोदर काकड,आकाश करे,तहसीलदार धीरज मांजरे,गोपाल भोयर,अजय मंत्री व नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री कडू पुढे म्हणाले,कारंजा तालुक्यातील नाथ समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत त्यांना जातीचे दाखले देण्यात येतील.नाथ समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात येईल.या अधिवेशनात संबधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन त्यांचे प्रश्न जागेवरच सोडविण्यात येतील.नाथ समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी निश्चितपणे पुढाकार घेण्यात येईल.या समाजातील हुशार मुलांची शिक्षणासाठी निवड करण्यात येईल. एकदाचे घरात रेशन नसले तरी चालेल पण शिक्षणासाठी पुस्तके असली पाहिजे.असे ते म्हणाले.
समाज कर्तृत्ववान होणे महत्वाचे असल्याचे सांगून श्री.कडू म्हणाले,समाजाच्या विकासासाठी समाजातील लोकांनी देखील आपले योगदान देणे आवश्यक आहे. समाजाच्या विकासासाठी पाठपुरावा करणारी टीम निर्माण झाली पाहिजे. समाज एकत्र राहिला तर भविष्यात समाजाची स्वतःची बँक देखिल उभी राहू शकते.समाज बांधवांनी पुढील पाच ते सहा वर्ष समाजाच्या मजबुतीसाठी काम करावे.असे श्री.कडू यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment