लोक अदालतीत एकूण ९२३ प्रकरणे निकाली
वाशिम दि.०८ (जिमाका) जिल्ह्यातील सर्व तालुका आणि जिल्हा न्यायालयामध्ये ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ११ पॅनेलच्या माध्यमातून एकूण ९२३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.एका प्रकरणी मृताच्या वारसाला विमा कंपनीने आपसी तडजोडीने ९ लक्ष ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.संजय शिंदे यांनी ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे तसेच दाखल प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमची मिटविण्यासाठी लोकन्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.
राष्ट्रीय लोकअदालतीत ११ पॅनल तयार करण्यात आली होती.या लोकअदालतीचे अनौपचारिक उद्घाटन न्या.श्रीमती शैलजा सावंत यांनी केले. लोकअदालतीच्या पॅनलला त्यांनी भेट दिली
लोकअदालतीमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडील दोन प्रलंबित प्रकरणांसह एकूण ८ हजार ३०० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९२३ प्रकरणे निकाली निघाली.
२ ते ६ मे २०२२ या कालावधीत जिल्ह्यात विशेष कलमांतर्गतची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन ४२२ प्रकरणे व इतर ८९ अशी एकूण ५११ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली.
या लोकअदालतीमध्ये न्या.एच. एम.देशपांडे यांच्या पॅनलवर मोटार अपघात नुकसान भरपाईची व इतर प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये एका दाम्पत्याचा मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. हे प्रकरण विमा कंपनी व त्या दाम्पत्यामध्ये आपसात तडजोड होऊन या प्रकरणात विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वारसाला ९ लक्ष ५० हजार रुपये नुकसानभरपाई दिली.
Comments
Post a Comment