प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

वाशिम, दि. २५ : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ठिबक व तुषार संचाकरिता अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संचासाठीचे ऑनलाईन अर्ज www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावरील ethibak पोर्टलवर किंवा www.ethibak.gov.in या ई-ठिबक प्रणालीवर सादर करण्याची प्रक्रिया मे २०१८ पासून सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२९९ शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्याला २० कोटी ९१ लक्ष रुपये आर्थिक लक्षांक देण्यात आला असून त्यापैकी ऑनलाईन प्राप्त अर्जांना पूर्वसंमती देण्यासाठी २ कोटी ३९ लक्ष ३६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. त्यानुसार तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत जिल्ह्यातील १०४८ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे.
ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावरील ethibak पोर्टलवर किंवाwww.ethibak.gov.in या ई-ठिबक प्रणालीवर सादर करावेत. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड तसेच सातबारा, ८ अ व राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असणे आवश्यक आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तालुका स्तरावर ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करून लाभार्थी क्रमांक व प्रस्ताव क्रमांकाच्या अनुक्रमे व तालुकास्तरावर प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांनी शेतात नोंदणीकृत उत्पादकांचे जिल्ह्यातील नोंदणीकृत ठिबक, तुषार संच विक्रेता, वितरकाकडून ठिबक, तुषार संचाची उभारणी करावयाची आहे. www.ethibak.gov.in या संकेतस्थळावर वर्षनिहाय जिल्ह्यातील नोंदणीकृत उत्पादक व नोंदणीकृत वितरकांची माहिती उपलब्ध आहे. पूर्वसंमती न घेता ठिबक, तुषार संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानास पात्र समजले जाणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप