वाशिम जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत यात्रा, जत्रा, उत्सवांवर बंदी


·          ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
·         यापूर्वी देण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द
·         आदेशाचे उल्लंघन केल्यास आयोजक, संयोजकांवर होणार कारवाई
वाशिम, दि. १५ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या कार्यक्रमांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत.
‘कोरोना’चा संसर्ग एका संक्रमित रुग्णाकडून संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना होत असल्याने या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील यात्रा, जत्रा, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दी होणार्‍या सर्व कार्यक्रमांना १४ मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच यापूर्वी अशा कार्यक्रमांना देण्यात आलेल्या परवानग्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
जत्रा, यात्रा, उरूस, धार्मिक अथवा सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरू यांनी विधिवत पूजा करण्यास किंवा परंपरेने करावायचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्यास बंदी असणार नाही. तसेच खाजगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतु, या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. या कार्यक्रमासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार किंवा नगरपंचायत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची त्यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यक्रमासाठी लेखी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
यात्रा, जत्रा, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दी होणार्‍या कार्यक्रमांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष श्री. मोडक यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करून कार्यक्रमाचे आयोजन केले तर संयोजकांवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. याकरिता सर्व संबंधित तहसीलदार, मुख्याधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
शाळा, कोचिंग क्लासेस, सिनेमागृहे राहणार बंद
नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या, सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मॉल, सुपर शॉपी, सिनेमागृहे, जलतरण तलाव, सर्व जिम, प्रक्षागार, नाट्यगृहे ३१ मार्च २०२० पर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर