जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु राहणार



·        गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
·        अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा
वाशिम, दि. २८ : जिल्ह्यात संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत असून संचारबंदीची अंमलबजावणी करण्यामध्ये पोलिसांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात २९ मार्च २०२० पासून पुन्हा सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ नंतर दवाखाने, औषधी विक्री केंद्र वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना, पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. किराणा माल खरेदी, मेडिकलला जाण्याच्या बहाण्याने अनेकजण शहरात फिरताना दिसत असून त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अन्नधान्य, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने व पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, औषध विक्री करणारी दुकाने, सर्व हॉस्पिटल नियामिपणे सुरु राहतील.
गांभीर्य ओळखा, संचारबंदी आदेशाचे पालन करा : जिल्हाधिकारी
कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगभरात झपाट्याने वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी घरातच रहावे, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी अथवा औषधी खरेदीसाठी शक्यतो एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना किमान मीटर अंतराने नागरिकांना उभा राहण्यासाठी राखणे आखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळूनच नागरिकांनी उभे रहावे. संचारबंदीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश