कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जीवनावश्यक शेतमालाची खरेदी-विक्री सुरु करण्याचे आदेश



·        ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ३० : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशात बदल करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी कमी करणे, आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
 कोरोना संदर्भात जनजागृती होण्यासाठी बाजार समिती कार्यक्षेत्रातील बाजार व उपबाजार क्षेत्रातील परिसरात लोकांना कोरोना विषाणूपासून काळजी घेण्याबाबत फलक लावून अथवा उद्घोषणाद्वारे आवाहन करावे व आवश्यक माहिती द्यावी. बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना विषयक जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करावे. बाजार आवारात सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याकडे संपूर्णपणे लक्ष देण्यात यावे. बाजार संपल्यानंतर तसेच रात्रीच्या वेळी बाजार आवारात स्वच्छता, औषध फवारणी करून बाजार आवर जास्तीत जास्त निर्जंतुक राहील, याची दक्षता घ्यावी. फवारणीसाठी शक्य असल्यास हायड्रोक्लोराईड स्प्रेचा किंवा अन्य रसायनाचा वापर करावा.
बाजार आवारातील सर्व घटकांना हात धुण्यासाठी बाजार समितीच्या बाजार आवारात पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. ठिकठिकाणी हात धुण्यासाठी साबण, औषधी (सॅनिटायझर) उपलब्ध करून द्यावे व उपस्थित व्यक्तींना त्याचा वापर करण्यास सांगावे. बाजार आवारामध्ये शेतमालाची एकदम आवक होणार नाही, तसेच एकदम गर्दी होणार नाही, या दृष्टीने संबंधित बाजार घटकांनी समन्वय ठेवून आपल्या स्तरावर नियोजन व अंमलबजावणी करावी. बाजार आवारात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा प्रवेश अत्यंत मर्यादित ठेवावा. अनावश्यक व विनाकारण बाजार आवारात कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देवू नये.
बाजार समितीमधील गर्दी कमी राहील यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. याकामी पोलीस यंत्रणेची तातडीने मदत घेवून बाजार आवारात गर्दी कमी राहील, याची दक्षता घ्यावी. या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित तहसीलदार यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा. बाजारात वावरणाऱ्या व्यक्ती किमान तीन फुट अंतरावर राहतील, याची दक्षता घ्यावी. याबाबत वारंवार उद्घोषणा करावी.
सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या व्यक्तींना बाजार आवारात प्रतिबंध करावा. तसेच अशी व्यक्ती आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळवावे. काही बाजार घटकांनी कामकाज सुरु न ठेवल्यास, बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आवक झालेला शेतमाल आणि घाऊक खरेदीदार यांचा समन्वय करून शेतमालाची खरेदी विक्री सुरु राहील. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या मजूर, हमाल, शेतकरी, व्यापारी यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सींग पाळावे. बाजार समितीमधील स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी संबधित कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित