वाशिम जिल्ह्यात प्रवेश बंदी; जिल्ह्यातून बाहेर जाण्यास सुध्दा मनाई - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



·        जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
·        जिल्हा सीमा बंदीची कडक अंमलबजावणी होणार
·        बाहेरील जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार
वाशिम, दि. २८ : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. बाहेर जिल्ह्यातून अथवा राज्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत, त्यांना तिथेच राहण्याची सूचना नातेवाईकांनी करावी. बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था तिथल्या जिल्हा प्रशासनामार्फत करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेले लोक आपल्या जिल्ह्यात येवून येथील नागरिकांना त्याचा संसर्ग होवू नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत, त्यांना तिथेच जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविले जाईल. मात्र कोणत्याही यापुढे जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, बाहेरील जिल्ह्यातील मजुरांना, नागरिकांना जिल्हा प्रशासन जीवनावश्यक वस्तू पुरविणार आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत अथवा इतर राज्यातील, जिल्ह्यात मजूर आपल्या जिल्ह्यात असतील तर अशा लोकांची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार (भ्रमणध्वनी क्र. ७७४४९८४२६५) यांना कळवावीत, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश