४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
महात्मा जोतिराव फुले
शेतकरी कर्जमुक्ती योजना
·
कर्ज रक्कमेला शेतकऱ्यांची मान्यता
घेवून कार्यवाही
·
शेतकऱ्यांना लगेचच प्रमाणीकरणाचे
प्रमाणपत्र उपलब्ध
वाशिम, दि. ०३ : राज्य शासनच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकासह जिल्ह्यातील ८३ हजार ६३४ शेतकऱ्यांची दुसरी यादी
प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित गावांमध्ये ही यादी २९ फेब्रुवारी रोजी
प्रसिद्ध करण्यात आली असून आपले सरकार सेवा केंद्र, बँकेच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही गतीने सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या चार
दिवसांत सुमारे ४५ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आधार
प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकऱ्यांना
माहिती देऊन मान्यता घेणे आहे. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादी नाव
असलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याने आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक
व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणीकरण
करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट
क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक, बँक खाते
क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य
असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. जर
संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक,
कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकऱ्यांनी ‘अमान्य’
पर्यायाची निवड करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात
संबंधित शेतकऱ्यांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जातील, त्यावर
जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेईल.
प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र, तक्रारीची प्रत देणे बंधनकारक
शेतकऱ्याने
‘मान्य’ अथवा ‘अमान्य’ यापैकी कोणताही पर्याय निवडून आधार प्रमाणीकरण पूर्ण
करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, बँकेने अथवा सहकारी सेवा
सोसायटीने लगेचच पूर्ण झाल्याच्या प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र अथवा तक्रारीची प्रत
उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रावर बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक व
कर्ज रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित आपले सरकार सेवा
केंद्र अथवा बँकेत आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर आपल्या प्रमाणपत्राची प्रत
प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Comments
Post a Comment