संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक




·        जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा; खरेदीसाठी गर्दी नको
·        अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा
वाशिम, दि. २४ : कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. याबाबीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. अत्यावशक कारणाशिवाय घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. शहरातील पाटणी चौक येथील मुख्य बाजारपेठेत संचारबंदीच्या अंमलबजावणीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी सुद्धा यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, देशात तसेच राज्यातही ‘कोरोना’चा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांचा या विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री कायमस्वरूपी, नियमितपणे सुरु ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाच वेळी खरेदीसाठी बाहेर पडून गर्दी करू नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवू नये. संचारबंदी लागू असतानाही काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. कोणतेही ठोस, अत्यंत महत्वाचे कारण असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात येणारी व बाहेर जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातही संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन करू नये, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल. ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग सर्वांसाठीच घातक असून आपण योग्य खबरदारी घेतली नाही, प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही, तर या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबावे व सुरक्षित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश