विकास कार्यक्रमांमध्ये खासगी कंपन्या व समाज घटकांना सहभागी करून घेणार - लक्ष्मीनारायण मिश्रा
वाशिम, दि. १९ : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी नीती आयोगाने जिल्ह्याची
निवड आकांक्षित जिल्हा म्हणून केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तसेच सर्व समाज
घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात
येणाऱ्या विविध विकास कार्यक्रमांमध्ये खासगी कंपन्या आणि समाज घटकांना सहभागी
करून घेणार असल्याचे मत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील वाकाटक सभागृहात १८ डिसेंबर रोजी सोशल रिस्पॉन्सबिलीटी सेलचे सहकार्य
जिल्ह्याच्या विकास कार्यक्रमामध्ये घेण्याच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी
बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान
यांची विशेष उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
श्री. मिश्रा म्हणाले, इथल्या गरजा आणि परिस्थिती पाहून आवश्यक त्या ठिकाणी खासगी
कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येईल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण
शिक्षण कशाप्रकारे देता येईल, याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य,
शिक्षण, पिण्याचे पाणी, आर्थिक उत्पन्न वाढ, सोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे
होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून अतिजोखमीच्या मातांसाठी रिलायन्सच्या
मदतीने काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती
खान म्हणाल्या, समाजातील विविध घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे, हा
समाधान अर्थात सोशल रिस्पॉन्सबिलीटी सेलचे काम असून यासाठी आम्ही काम करीत आहोत. विविध
यंत्रणा, सेवाभावी संस्था या ग्रामविकासासाठी काम करीत असतात. परंतु अनेकांना
त्यांच्या कामांची माहिती नसते. खासगी कंपन्या आणि समाजातील विविध घटकांना विकास
प्रक्रियेत सामावून घेतले, तर विकास कार्याला गती येईल या दृष्टीकोनातून आम्ही काम
करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरसारख्या आदिवासी बहुल आणि मागास जिल्ह्यात
या सेलच्या सहकार्यामुळे विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण
भागातील महिलांच्या क्षमता बांधणीचे काम करण्यात येत असल्याचे सांगून श्रीमती खान
म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री अॅमेझॉनच्या
माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत जागृत
करण्यात येत आहे. महालाभार्थी या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती
नागरिकांनी देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित काही अधिकाऱ्यांनी आपले
मत यावेळी व्यक्त केले व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
बैठकीला
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास
सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
दत्तात्रय गावसाने, जिल्हा अग्रणी प्रबंधक दत्तात्रय निनावकर, शिक्षणाधिकारी
माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी पाणी व स्वच्छता सुदाम इस्कापे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा
समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन
अधिकारी रेखा गुरव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment