वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



·        मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
·        ३० जुलैपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी
वाशिम, दि. १५ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ जुलै २०१९ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. तरी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे तपासणी होईल. १३ ऑगस्ट २०१९ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. १६ ऑगस्ट २०१९ पर्यंत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मतदार यादी निरीक्षक यांच्याद्वारे मतदार यादीची विशेष तपासणी करून डाटाबेसचे अद्यावतीकरण व पुरवणी याद्यांची तपासणी केली जाईल. त्यांतर १९ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. मोहीम
मोहीम कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठीचे अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी, २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी राबविल्या जाणाऱ्या विशेष मोहीम कालावधीत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून हे अर्ज स्वीकारतील. तहसीलदार कार्यालयात सुध्दा हे अर्ज सादर करता येतील. या अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, तहसीलदार कार्यालामध्ये उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे