शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



·         २४ जुलै पर्यंत भरता येईल विमा हप्ता
·         बँक, सामुहिक सुविधा केंद्रात प्रस्ताव सादर करण्याची सुविधा
वाशिम, दि. ०४ : जिल्ह्यात सन २०१९-२० खरीप हंगामसाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. वाकाटक सभागृहात झालेल्या पिक विमा विषयक जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषि विकास अधिकारी प्रल्हाद शेळके, भारतीय विमा कंपनीचे प्रतिनिधी डी. एन. बोबडे यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, बँक प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्रांचे (कॉमन सर्व्हिस सेंटर) प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, कर्जदार शेतकाऱ्यांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २४ जुलै २०१९ पर्यंत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी वाशिम जिल्ह्याकरिता भारतीय विमा कंपनीची नेमणूक झाली आहे. या विमा कंपनीने जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक तालुकास्तरावर आपले कार्यालय लवकरात लवकर सुरु करून शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा प्रस्तावही स्वीकारण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी मंजूर झालेल्या पिक विमा नुकसान भरपाईचे वाटप संबंधित कंपनीने तातडीने सुरु करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केल्या जात असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक तातडीने आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिल्या. आजच्या बैठकीला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
श्री. गावसाने म्हणाले, सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री पिक विमा विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.  तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पीक विमा योजनेचा पीकनिहाय विमा हप्ता
पिकाचे नाव
विमा संरक्षित
रक्कम रु.(प्रति हेक्टर)
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पीक विमा हप्ता
सोयाबीन 
४३,०००/-
८६०/-
कापूस
४३,०००/-
२१५०/-
तूर
३१,५००/-
६३०/-
मुग व उडीद
१९,०००/-
३८०/-
खरीप ज्वारी
२४,५००/-
४९०/-
तीळ
२३,१००/-
४६२/-
भुईमुग
३२,०००/-
६४०/-
भात
४३,५००/-
८७०/-

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे