पारिभाषिक शब्दावलीमुळे विषयाचा नेमका अर्थबोध होण्यास मदत - प्रा. धोंडूजा इंगोले



·        जिल्हा न्यायालयात व्याख्यान
·        ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजन
वाशिम, दि. १० : प्रत्येक विषयाची स्वतःची एक परिभाषा असते. पारिभाषिक शब्दावलीमुळे वाक्यांचा योग्य अर्थ स्पष्ट होवून त्याविषयी अचूक अर्थबोध होण्यास मदत होते, असे मत साहित्यिक प्रा. धोंडूजा इंगोले यांनी व्यक्त केले. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाशिम जिल्हा विधिज्ञ संघाच्यावतीने जिल्हा न्यायालयामध्ये १० जानेवारी रोजी आयोजित ‘शासकीय कामकाजात पारिभाषिक शब्दावलीचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. एस. पी. वानखेडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. जी. बाकलीवाल  उपस्थित होते.
प्रा. इंगोले म्हणाले, शासकीय कामकाजात पारिभाषिक शब्दावालीला अतिशय महत्व आहे. विविध विभागांचे पारिभाषिक स्वतंत्र शब्दकोश आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या शब्दावलीची माहिती असणे आवश्यक आहे. शासकीय कागदपत्रे, आदेश, अधिसूचना यामध्ये पारिभाषिक शब्दांचा अधिकाधिक वापर केला जातो. पारिभाषिक शब्दांमुळे वाक्याला संक्षिप्तता व क्रमबद्धता येते. त्यामुळे अचूक अर्थबोध होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. पारिभाषिक शब्दांच्या वापराचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे सुद्धा दिली.
न्या. वानखेडे म्हणाले, मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून मराठी भाषेतील तज्ज्ञ, साहित्यिक यांचे विचार ऐकण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून मिळणारे विचार आत्मसात करून माय मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत.
ॲड. बाकलीवाल म्हणाले, कोणत्याही भाषेत योग्य शब्दांचा वापर आपल्या संवादामध्ये असला पाहिजे. वेळेनुरूप शब्दांचा वापर करण्याची कला ही वाचनातून आणि श्रवणातून प्राप्त होते.
कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे, न्या. एस. बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस. पी. शिंदे, न्या. एस. पी. बुंदे, न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. पी. एच. नेरकर, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, कोषाध्यक्ष ॲड. श्रध्दा अग्रवाल यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे उपस्थितांचे आभार ॲड. माधुरी वालचाळे यांनी मानले.

Comments

  1. शब्दात अफाट सामर्थ असल्याची जाणीव आणि उजळणी झाली.... खूप छान.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे