खरीप हंगामात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई
· खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा
· शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासा
· बोगस बियाणे, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
· पीक कर्ज वितरण उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य नियोजनाच्या सूचना
वाशिम, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आगामी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे घरगुती बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कृषि विभागाने योग्य नियोजन करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आवश्यक पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आज, २५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे अकोला येथून या बैठकीत सहभागी झाले होते. वाशिम येथून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी बैठकीत सहभागी झाले होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, गतवर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे घरगुती बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही. त्यामुळे याबाबतची माहिती संकलित करून आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. तसेच सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी कृषि विभागाने विशेष मोहीम राबवावी. जेणेकरून आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच खरीप हंगामात बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री होवू नये, यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नेमावीत. अशाप्रकारे बोगस बियाणे, कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
खरीप हंगामात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. सर्व बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी नियमितपणे पाठपुरावा करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. धोत्रे म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य वेळी कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे नियोजन करून त्यानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज मिळेल, याची खबरदारी घ्यावी. जेणेकरून पिक कर्ज वाटपाबाबत कोणत्याही शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत. तसेच वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत झालेल्या सामुहिक शेततळ्यांमध्ये अस्तरीकरणसाठी वापरलेली ताडपत्री जुनी होवून ती खराब झाली आहे. त्यामुळे शेततळ्यातून पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या माध्यमातून जुन्या सामुहिक शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ताडपत्री उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी.
खासदार श्रीमती गवळी म्हणाल्या, जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून पांदन रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मदत होईल. पांदन रस्त्यांची कामे अधिक गतीने व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आमदार श्री. झनक म्हणाले, शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. तसेच बियाणे व खते विक्री करतांना होणाऱ्या लिंकिंगसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर मुंगळा येथील काही शेतकऱ्यांचा संत्रा गुजरात व तेलंगाना राज्यात अडकला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री श्री. देसाई यांनी गुजरात व तेलंगाना राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment