वाशिम जिल्ह्यात पाच दिवसात ३ हजार ८४८ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप
·
१
लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकांना लाभ
·
चढ्या
दराने वस्तूंची विक्री केल्यास कारवाईचा इशारा
वाशिम, दि. ०६ (जिमाका) :
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन
करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यातील कोणताही नागरिक उपाशी राहता कामा नये,
यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे सुरळीत वितरण सुरु असून १ ते ५
एप्रिल २०२० या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील १ लक्ष ७९ हजार ६६
शिधापत्रिकाधारकांना तब्बल ३ हजार ८४८ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात
आल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.
जिल्ह्यात
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा
दोन्ही गटातील सुमारे १० लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील ७७५ स्वस्त
धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून अन्नधान्य वितरीत केले जाते.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत २ रुपये प्रतिकिलो दराने
१५ किलो गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो.
त्याचप्रमाणे २० रुपये प्रतिकिलो दास्राने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी
रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये प्रतिकिलो दराने
प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ
दिला जातो. वाशिम जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे २१ हजार ७५४.७ क्विंटल गहू, १६
हजार ७३३ क्विंटल तांदूळ तर ३४६ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर
स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २ हजर ९०४ शिधापत्रिकाधारकांनी
ते जेथे राहत आहेत, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलिटी सुविधेअंतर्गत ऑनलाईन
पद्धतीने अन्नधान्य घेतले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.
९ एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदूळ उपलब्ध
प्रधानमंत्री
गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून दरम्यान प्रतिलाभार्थी प्रतिमहिना ५
किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. पात्र शिधापत्रिकाधारकांनी नियमित स्वरुपात
धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त
तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे पात्र
शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य घेतल्यानंतर प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ उपलब्ध
करून जाईल. याकरिता तांदळाचे नियतन गोंदिया जिल्ह्याकडून प्राप्त करून घेतले जात
असून ९ एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना तांदळाचे वितरण सुरु होणार आहे. मे आणि
जून महिन्याचे मोफत तांदूळ त्या-त्या महिन्यात वितरीत केले जाणार आहे.
चढ्या दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
वाशिम
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून
वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता शासकीय यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र,
सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व भाववाढीच्या काही ठिकाणहून तक्रारी
प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर
संयुक्त कारवाई करण्याचे आदेश पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना
देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.
*****
Comments
Post a Comment