भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
वाशिम, दि. १३ (जिमाका) :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मंगळवार, १४ एप्रिल रोजी जयंती आहे. दरवर्षी
देशात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती
सोहळा साजरा होतो. मात्र, यंदा देशभरात लॉकडाऊन असल्याने यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचा जयंती सोहळा घरीच साजरा करण्याचे आवाहन गृह राज्यमंत्री तथा वाशिम
जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना केले
आहे.
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा
संसर्ग टाळण्यासाठी घरात राहणे, हाच एकमेव आणि आपल्या हातात असलेला उपाय आहे.
त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला
आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीनिमित्त यावर्षी सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित न करता घरीच जयंती
साजरी करावी. घरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
करून त्यांना अभिवादन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment