काही सवलतींसह जिल्ह्यात २७ मे पर्यंत कडक निर्बंध कायम

 


·       बँक, पोस्ट ऑफिस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार

वाशिम, दि. २० (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध काही सवलतींसह २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १९ मे रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहतील. भाजीपाला दुकाने व फळे विक्रेत्यांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरुपात ठिकाणे निश्चित करून द्यावीत व याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. या व्यतिरिक्त सर्व दुकाने तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गट विकास अधिकारी यांच्या स्तरावरून होणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत वृत्तपत्रे घरपोच पोहचविण्याची मुभा राहील. परंतु कोठेही स्टॉल लावून वृत्तपत्र विक्री करता येणार नाही. दुध संकलन केंद्र व घरपोच दुध वितरणास सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा राहील.

ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील. स्थानिक दुकानदार, हॉटेलामार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था करतील. या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु ठेवता येईल. नागरिकांनी औषधी  खरेदीसाठी बाहेर पडताना प्रिस्क्रिप्शन सोबत बाळगणे आवश्यक आहे. चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.

शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेले धान्य विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. या कालावधीत आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरु राहील. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद हे याबाबतचे संनियंत्रण करतील.

जिल्ह्यातील शेतीशी निगडीत असलेली सर्व कृषि सेवा केंद्र सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना खते, बियाणे शेतीच्या बांधावर अथवा घरपोच उपलब्ध करून देण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा राहील. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठा कमी पडू नये, यासाठी कृषि संबंधित व्यवसायाबाबत कंपनी प्रतिनिधी यांना निविष्ठांची प्रात्याक्षिके (डेमो) देण्याकरिता सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा राहील. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे यांची वाहतूक करण्यासाठी तसेच सदर खते व बियाणे रेल्वे रॅकवरून उतरवून ते गोडाऊनमध्ये साठवणूक करण्याकरीता मुभा देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यासाठी डीझेलची आवश्यकता असते. त्यामुळे ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅनसाठी डीझेल उपलब्ध करून देण्यास मुभा देण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपनीच्या अधिकृत वाहनाला केवळ शेती कामासाठी बांधावर डीझेल उपलब्ध करून देता येईल. यासाठी संबंधित तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आगाऊ सूचना देणे बंधनकारक असेल. कोणत्याही परिस्थिती याद्वारे पेट्रोल विक्री करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत.  सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही, त्याचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर राहील.

सर्व पेट्रोलपंपावर या आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबींकरिताचा पेट्रोल करण्यात यावे. याव्यतिरिक्त महसूल विभाग, डॉक्टर्स, विद्युत विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, नगरपालिका विभाग, पोलीस कर्मचारी, बँक व पोस्ट कर्मचारी, कोषागार कार्यालय, माल वाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी  कंपनीचे अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. तसेच दुध वितरक, मेडिकल धारक, भाजीपाला व फळ विक्रेते, किराणा दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन केंद्र चालक, कृषि व गॅस एजन्सीधारक यांना घरपोच सेवेची मुभा देण्यात आली असल्याने पेट्रोलपंपांवरून पेट्रोल, डीझेल भरण्याकरिता मुभा रहील. मात्र, घरपोच सेवा देणाऱ्या व्यावसायिक, कामगार यांनी ओळखपत्र स्थानिक तहसीलदार यांचेकडून प्राप्त करून सोबत बाळगणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील दवाखाने, आरोग्य यंत्रणेशी संबंधित आस्थापनांना जनरेटरसाठी तसेच नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या टँकर इत्यादींना आवश्यक पेट्रोल, डीझेल उपलब्ध करून देण्यास मुभा राहील. जिल्ह्यात सुरु असलेली रस्ते, महामार्गाची कामे व इतर शासकीय कामे सुरळीत सुरु ठेवण्याकरिता कंत्राटदारांकडे सदर कामासंबंधित असलेल्या वाहनांकरिता पेट्रोलपंपावरून पेट्रोल, डीझेल भरण्याकरिता मुभा राहील.

जिल्ह्यातील नोंदणीकृत पत्रकार यांना पत्रकारीतेकारिता त्यांच्या कार्यालयात जाण्याकरिता मुभा देण्यात आली आहे. परंतु, संबंधित पत्रकार यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. याशिवाय पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याकरिता पत्रकारांना सूट देण्यात येत आहे, त्यांनी पेट्रोल भरताना ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

गॅस एजन्सीज मार्फत गॅस सिलेंडरचे घरपोच वितरण करण्यात यावे. परंतु,  ग्राहकांनी गॅस  एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहणार आहे. गॅस एजन्सीमध्ये ग्राहक आढळून आल्यास संबंधित एजन्सी कारवाईस पात्र राहील. याबाबतच्या पर्यावेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहणार आहे.

सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत. बचत (सेव्हिंग) खातेधारक ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या बचत खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ० अथवा १ असल्यास सदर ग्राहकांना बँकेत केवळ सोमवारी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांकाचा शेवटचा अंक २ किंवा ३ असल्यास मंगळवारी, ४ किंवा ५ असल्यास बुधवारी, ६ किंवा ७ असल्यास गुरुवारी आणि ८ किंवा ९ असल्यास शुक्रवारी बँकेत प्रवेश दिला जाईल.

एलआयसी कार्यालाचे अंतर्गत कामकाज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल, मात्र ग्राहकांसाठी सेवा बंद राहील. जिल्ह्यातील बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र बँक संबंधित व्यवहारासाठी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सनदी लेखापाल (सीए) यांची कार्यालये कमीत कमी मनुष्यबळामध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत फक्त अंतर्गत कामासाठी सुरु राहू शकतील. ग्राहकांना कार्यालयात जाता येणार नाही. केंद्रीय भांडार निगमचे कर्मचारी, हमाल यांना ओळखपत्र जवळ ठेवण्याच्या अधीन राहून त्यांच्या कामासाठी जाण्याची मुभा राहील.

सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, बँड पथक यांना परवानगी राहणर नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी असेल व लग्नसोहळा २ तासांत आटोपणे बंधनकारक आहे. बेकायदेशीररित्या लग्नसोहळा पार पडणार नाही, याची संबंधित ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीने दक्षता घ्यावी. बेकायदेशीररीत्या लग्नसोहळा आयोजित केल्यास नियानुसार कारवाई करण्यात येईल. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची असेल.

सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील जसे की महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, नगरपालिका आदी. तसेच अत्यावश्यक सेवे अंतर्गत महावितरण, कोषागार, पाणी पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन इत्यादी शासकीय कार्यालये सुरु राहतील. इतर कार्यालयांना आपले कामकाज ऑनलाईन सुरु ठेवण्याची मुभा राहील.

शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत. अतिआवश्यक कामांसाठी ८३७९९२९४१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ इन-सिटू (In-situ) कामकाज सुरु राहील. याबाबतची जबाबदारी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापन यांच्यावर असेल.

सर्व सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. रूग्णांसाठी रिक्षा व खासगी वाहनास परवानगी राहील. याबाबतचे नियंत्रण वाहतूक पोलीस शाखेने ठेवावे.

मालवाहतूक व रुग्णवाहतूक करणाऱ्या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. मात्र, मालवाहतूक साठा, खत साठा आदींबाबत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे. कार्गो सेवेची वाहतूक करतांना दोन व्यक्तींना (ड्रायव्हर व क्लीनर) यांना महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडे ४८ तासाच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असून तो अहवाल ७ दिवस वैध राहील.

इतर कारणांसाठी व आवश्यक वैद्यकीय कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरून ई-पास काढून वाहतूक करता येईल. कोणत्याही व्यक्तीला परराज्यातून महाराष्ट्रात व जिल्ह्यात कोणत्याही वाहनाने प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडे ४८ तासाच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे.

या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरी भागात नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी, तसेच ग्रामीण भागात संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे इंसिडेंट कमांडर म्हणून तहसीलदार व पोलीस विभागाची राहणार आहे. हे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागू होतील. तसेच कोणत्याही क्षेत्रास कामकाज सुरु ठेवण्यासाठी विशेष परवानगी २६ मेपर्यंत देण्यात येणार नाही. सर्व आस्थापनांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आपापल्या स्तरावरून त्रिसूत्री पद्धतीची अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश